चाकरमान्यांची "मैना' गावाकडंच राहणार 

chakarmani
chakarmani
Updated on


सांगली ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची "माझी मैना गावावर ऱ्हाईली, माझ्या जिवाची होतिया काहिली...' ही छक्कड रचना अजरामर आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगावसह काही भाग कर्नाटकात राहिल्याची हळहळ, खेद, खंत त्यातून प्रतीत व्हायची. शिवाय, मुंबईत काम करणाऱ्या चाकरमान्यांना गावाकडं राहिलेल्या बायकोची आठवण झाल्यानंतर त्यांच्या दाटलेल्या भावनाही त्यातून प्रतीत होतात, असं म्हटल जातं. "कोरोना'च्या संकट काळात पुन्हा चाकरमान्यांची तशीच अवस्था होणार आहे. महानगरी मुंबई पुन्हा धावायला लागली, की सुमारे आठ ते दहा हजार चाकरमानी आपल्या बायका-मुलांना गावाकडं सोडूनच कामावर परततील. 


जिल्हा परिषदेची यंत्रणा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागात मुंबई, पुणे आणि परराज्यातून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवून आहे. आरोग्याची काटेकोरपणे नोंद घेतली जात आहे. हे करताना एक मुद्दा या यंत्रणेच्या प्रकर्षाने लक्षात आला, तो म्हणजे हे लोक पुन्हा कामावर जाताना किंवा नव्या कामाच्या शोधात मुंबई-पुण्याला रवाना होताना आपला कुटुंबकबेला गावाकडेच ठेवतील. त्यादृष्टीने तयारी ठेवा, या चाकरमान्यांच्या मुलांना शाळेत विनाअट प्रवेश द्या, असे आदेशच जिल्हा परिषदेने दिले आहेत. 


काही दशकांआधी चाकरमानी एकटेच मुंबईला जायचे. ते मिल, गोदी कामगार होते. बायका-मुलं गावाकडं असायची. सहा महिने, वर्षातून ते यायचे. अण्णा भाऊंचे ते शब्द आपल्या विरह भावनाच व्यक्त करणाऱ्या आहेत, असे त्यावेळी चाकरमान्यांना वाटायचे. आज पुन्हा एकदा ते संकट आलेआ हे. कारण जिल्ह्यात 25 हजारांहून अधिक लोक बाहेरून आलेत. ती संख्या वाढतेच आहे. मुंबईसह महानगरे पुन्हा धावायला लागल्यानंतर त्यांना परत जावे लागेल. तेथे नोकरी टिकेल का, याची शंका आहे. नवी नोकरी मिळेल का, हेही माहीत नाही. यातील बहुतांश लोक कुटुंबासह चाळीत राहायचे. सार्वजनिक शौचालय वापरायचे. परत गेल्यावर तेच भोग आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची धास्ती जास्त आहे. त्यापेक्षा दोन घास कमी मिळाले तरी चालतील, पण बायका-मुलं सुरक्षित ठेवून आपण लढाईला जावं, असं त्यांनी ठरवलंय. हे संकट टळलं की ते पुन्हा कुटुंबाला घेऊन जातील, तोवर या जागतिक लढाईत कुटुंबाचा विरह त्यांना सहन करावा लागणार आहे. 

 
""मुंबई, पुण्यासह बाहेरून आलेल्या शेकडो चाकरमान्यांची कुटुंबे काही वर्षे आपल्या गावीच मुक्काम करणार आहे. त्यांच्या मुलांना कोणत्याही अटीशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्याची सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊ.'' 

प्राजक्ता कोरे, 
अध्यक्षा, जिल्हा परिषद, सांगली 


""आम्ही मुंबईला एकटेच जाणार आहोत. कुटुंबाला घेऊन जाणे धोक्‍याचे आहे. आमच्या नोकऱ्या खासगी आहेत. काही जणांची कामे सुटणार आहेत. त्यांना काम शोधावे लागेल. आम्हाला चाळीत राहतो, कॉमन बाथरूम वापरावे लागते. त्यामुळे या अडचणीत किमान वर्षभर तरी आम्हाला ही सोय करावी लागेल.'' 

रामचंद्र चौगुले, 
इनामवाडी, शिराळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com