पाण्याबाबत ना आस्था, ना कळकळ; पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्थिती

water.jpg
water.jpg

पिंपरी : शहरात दूषित, अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत मंगळवारी महापालिका भवनात बैठक झाली. त्याकडे जबाबदार पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. तर, संबधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप करत उपमहापौर तुषार हिंगे बैठक अर्ध्यातच सोडून निघून गेले. यामुळे "पाण्याबाबत ना कोणाला आस्था, ना शहराची कळकळ' असेच दिसून आले. 
समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी आणि कमी दाबाने, अनियमित व अपुरा पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सोडविण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

25 नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता पवना धरण शंभर टक्के भरले आहे. अशुद्ध जलउपसा करणारा रावेत बंधारा ओसांडून वाहतोय. तरीही त्याच तक्रारी, तेच अधिकारी आणि तेच पदाधिकारी आहेत. उपमहापौर हिंगे यांच्या आग्रहावरून महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातून काहीही साध्य झाले नाही. बैठकीकडे विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे व अपक्ष गटनेते आणि सत्ताधारी भाजपसह सर्वच नगरसेवकांनीसुद्धा पाठ फिरवली. पाणी वितरण प्रणालीची संपूर्ण माहिती असलेले कनिष्ठ अभियंते गैरहजर राहिले. यावरून कोणाला व किती आस्था? हे अधोरेखित होते. दरम्यान, बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही, याबाबत "आणखी काही महिने दिवसाआडच पाणी' असे वृत्त "सकाळ'ने मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. 

अनुत्तरीत प्रश्‍न 

  • पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने बैठकीतून बाहेर पडलो, असे हिंगे यांनी सांगितले. वास्तविक त्यांच्याच आग्रहावरून बैठक झाली आणि त्यांनीच "वॉकआऊट' केले. हा त्यांचा स्टंट होता का? 
  •  पाणीपुरवठा विभागात दहा वर्षांपासून तांबे आहेत. पाणी वितरण व्यवस्थेचा त्यांचा बारकाईने अभ्यास असल्याचे जाणवते. तरीही त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, की जाणीवपूर्वक तशी भूमिका घेवून हिंगे यांना डिवचायचे होते? 
  •  दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाला, तेव्हा तांबे कार्यकारी अभियंता होते. तेव्हाही त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली. उलट पदोन्नती मिळून सहशहर अभियंता झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांतील हेवेदाव्यातून त्यांना टार्गेट केले जात आहे? 
  •  ज्युनिअर इंजिनिअर कुठे आहेत? असे मी बैठकीत विचारले असताना "मी असताना, त्यांची काय गरज?', असे उत्तर तांबे यांनी दिल्याचा आरोप हिंगे यांचा आहे. यातून तांबेंचा उद्धटपणा दिसतो. पदाधिकाऱ्यांच्या प्रश्‍नाला कसे उत्तर द्यावे, याचे भान नाही की पदाची हवा डोक्‍यात गेली? 
  • जलसंपदा विभागाकडून प्रतिदिन 470 दशलक्ष लिटर पाणीसाठा मंजूर आहे. सध्या जादा पैसे मोजून 510 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी घेतले जाते. तितकीच जलशुद्धीकरण क्षमताही आहे. त्यापेक्षा जादा पाण्यासाठी प्रकल्पाची क्षमता वाढवावी लागेल, हे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना माहित नाही का? 

नागरिक म्हणतात... 
पवना धरण शंभर टक्के भरलेले असूनही दिवसाआड, कमी दाबाचा व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याबाबत "सकाळ'ने निदर्शनास आणून दिले. या विषयावर उपमहापौर तुषार हिंगे यांनी बोलविलेल्या बैठकीला 128 पैकी केवळ आठ नगरसेवक हजर होते, हे वाचून संताप आला. 24 तास पाणीपुरवठ्याच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने दिवसाआड का होईना, पण, पुरेशा दाबाने व शुद्ध पाणी पुरवावे, ही माफक अपेक्षा. मात्र, गैरहजर राहिलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा धिक्कार आहे. अतिरिक्त आयुक्त अजित पवार व पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी उत्तरे न दिल्याचा खेद वाटतो, असे चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक किरण येवलेकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com