विवाहेच्छू तरुणांनो सावधान! फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय

Marriage
Marriage

पिंपरी - साधे घर म्हणून नकार... चांगली नोकरी नाही म्हणून नकार... घरात वयस्क आई-वडील आहेत म्हणून नकार... शेती आहे; पण तीही थोडीच म्हणून नकार... अशा विविध कारणांमुळे विवाहासाठी तरुणांना नाकारले जात आहे. यातूनच वय वाढलेल्या तरुणांची संख्या लक्षणीय झाली आहे. त्यातून मानसिक कोंडीत सापडलेले असे उपवर हेरून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे समोर येत आहे. त्यांना लग्नाचे आमिष दाखवत पैसे उकळायचे. काही दिवसांनी बनावट लग्न लावून द्यायचे. ती काही दिवस त्याच्यासोबत राहते आणि नंतर रोकड व सोन्याचे दागिने घेऊन ‘नवरी’सह पसार होणाऱ्या टोळीकडून तरुणांची फसवणूक होत आहे. 

वडगाव मावळ येथे असाच एक प्रकार उघडकीस आला. यामुळे विवाहेच्छूक तरुणांनी अशाप्रकारच्या आमिषाला बळी न पडता सर्व पुरेपूर माहिती घेऊन खात्री करूनच पुढचे पाऊल टाकणे गरजेचे आहे. लग्नाचे आमिष दाखवून मावळातील दिवड येथील एका मुंबईच्या डबेवाल्याची सुमारे सव्वाचार लाखांची फसवणूक करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती पाटील ही टोळीतील मुख्य आरोपी आहे. दिवड येथील तरुणाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अशाप्रकारे फसवणूक होण्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र, बदनामी होण्याच्या भीतीने काहीजण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, यामुळे संबंधित तरुणाचे आयुष्य बरबाद होण्यासह आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. तरी वय वाढलेल्या तरुणांनी यापासून सावध राहणे आवश्‍यक आहे. 

सोशल मीडियावरील माहितीची खात्री करा
विवाह जमविणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या नावाखाली फोन येत असतात. तसेच, सोशल मीडियावरूनही माहिती देऊन तरुणींचे फोटो पाठवून तरुणाला लग्नासाठी तयार केले जाते. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वी सर्व माहितीची खात्री करणे आवश्‍यक आहे. कुटुंबातील सदस्यांसह इतर नातेवाइकांनाही याबाबतची कल्पना असणे गरजेचे आहे.

वधू-वर सूचक मंडळांचे पेव
सध्या वधू-वर सूचक मंडळांचे पेव फुटले आहे. ठिकठिकाणी अशाप्रकारचे मंडळ पहायला मिळत आहेत. विवाहेच्छुक तरुण-तरुणींची नोंदणी करून ठराविक रक्कम घेतली जाते. त्यामध्ये नाव नोंदविल्यानंतर स्थळ पाठविले जाते. मात्र, स्थळ सुचविल्यानंतर खात्रीशीर माहिती घेण्यासह कार्य पाडण्याची सर्व जबाबदारी कुटुंबीयांची असते. 

तणावाखाली घेतलेला निर्णय येतो अंगलट
एकीकडे वय वाढत असताना दुसरीकडे मात्र, लग्न जमत नसल्याने अनेक तरुण तणावाखाली असतात. कुटुंबीयांसह नातेवाइकांकडूनही थोडे ॲडजस्ट करून लग्न उरकून घ्यावे, असा लग्न करण्याचा तगादा सुरू असतो. अशावेळी एखादे स्थळ चालून आल्यास शक्‍यतो काही जण ते स्थळ नाकारत नाहीत. मात्र, कधीकधी हाच निर्णय अंगलट येतो.

अशी होते फसवणूक 
या टोळीतील सदस्य काही वधू-वर सूचक मंडळांकडून वय वाढलेल्या विवाहेच्छूक तरुणांची माहिती घेतात. त्यांच्याशी संपर्क साधून स्थळ असल्याचे सांगितले जाते. तरुणांकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन स्त्रीशी लग्न लावून देतात. ती सासरी काही दिवस राहिल्यानंतर तिला परत माहेरी जाण्यासाठी टोळीतील इतर सदस्य तिला घेऊन जातात. त्यानंतर परत नांदविण्यास पाठवत नाहीत. दरम्यान, घरात कोणी नसल्याचे पाहून पैसे व दागदागिने घेऊन तिच्या साथीदारांसह पसार होते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com