
पालिकेवर हंडा मोर्चाचा इशारा
किवळे, ता. १८ : शहरात विविध ठिकाणी नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तरी देखील पालिका पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असेल तर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत महिला आघाडीच्या चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, ज्योती भालके, रजनी वाघ, योगिनी राजीव यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. मानसी रोज १६५ लिटर पाणी मिळेल यानुसार पवना धरणातून रोज ५०० एमएलडी पाणी रावेत बंधाऱ्यात साठवले जाते, परंतु ५०० एमएलडी मधून पाण्याची चोरी किती होते, गळती किती होते ? यावर प्रशासन लक्ष देत नाही. केवळ हलगर्जीपणामुळे शहराला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, एक महिन्याच्या आत हा प्रश्न निकाली लावला नाही तर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.