सुमारे २८ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे काम पूर्ण
रावेत, ता.९ ः रुग्णांना अधिक सक्षम आणि व्यापक आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून आयुष्मान योजनेअंतर्गत शहरात ७९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये जिजाऊ क्लिनिक विलीन केली जात असून रावेतसह, तळवडे, चिखली, चऱ्होली येथे आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील २८ ठिकाणी केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे.
महापालिकेचे प्राथमिक दवाखाने प्रामुख्याने लहान आजारांवरील तपासणी व औषधे पुरवतात; तर जिजाऊ क्लिनिकमध्ये महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी, माता-बाल आरोग्य, लसीकरण यावर भर दिला जातो. परंतु, नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळावी, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र ही नवी संकल्पना राबवली जात आहे.
या २८ केंद्रांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. प्रत्यक्षात ही आरोग्यवर्धिनी केंद्रे पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत तर उर्वरित डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
आरोग्यवर्धिनीची वैशिष्ट्ये
- सर्वसामान्य तपासणी करता येणार
- बाल आरोग्य, माता-बाल सेवा, एक्स-रेची सुविधा
- प्रयोगशाळेतील तपासण्या, तातडीची उपचार शक्य
- औषध वितरणासह दंत तपासणी अशा विविध मिळणार
- रुग्णांवर अल्प खर्चात सुलभ उपचार
कुठे सुरू होणार ?
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात रावेत, तळवडे, चिखली, चऱ्होली, निगडी व आकुर्डी परिसरासह शहरातील २८ ठिकाणी ही रुग्णालये लवकरच सुरू होणार आहेत. तर एकूण ७९ ठिकाणी जिजाऊ क्लिनिकचे विलीनीकरण करून आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
मनुष्यबळ उपलब्धता
महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक केली जाणार असून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. त्यात प्रत्येक केंद्रावर एक डॉक्टर, एक परिचारिका, एक केमिस्ट आणि एक वर्ग, चारचा कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रुग्णांना २ ते रात्री १० वाजेपर्यंत आरोग्य सेवा मिळणार आहेत.
वाढती लोकसंख्या लक्षात घेता चांगली वैद्यकीय सेवा मिळणे ही काळाची गरज आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे आम्हाला प्राथमिक ते तातडीच्या उपचारांपर्यंतच्या वैद्यकीय सेवा घराजवळ मिळतील. हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
- श्याम बन, स्थानिक रहिवासी, रावेत
केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या आर्थिक मदतीतून महापालिका हद्दीतील ७९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहे. तसेच औषधांसाठी सुद्धा आर्थिक मदत होणार आहे. इथे सर्व प्रकारच्या प्राथमिक सेवा देण्यात येणार आहे. आतापर्यंत २८ ठिकाणी ही केंद्रे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी जागेच्या अडचणी येत आहे. त्या सोडवून डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने वरील सर्व ठिकाणी ती सुरू केले जातील. पहिल्या टप्प्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रे ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या रुग्णालयांमुळे नागरिकांना तत्काळ उपचार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मिळतील.
- लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.