
चांदखेड, आढलेमधील पुलाची कामे करण्याची मागणी
सोमाटणे, ता. १७ ः चांदखेड आढले व चांदखेड बेबडओहोळ या दोन रस्त्यावरील पुलाचे काम न केल्याने अपघात वाढले असून, पुलाचे काम त्वरित करण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे.
वाहनांची संख्या वाढल्याने शासकीय निधीअंतर्गत चांदखेड गाव जोडणाऱ्या चांदखेड आढले व चांदखेड बेबडओहोळ या दोनही रस्त्याचे रुंदीकरण व खडी डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. सध्या ते पूर्ण होण्याच्या अंतिम टप्यावर आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाबरोबर पुलाच्या रुंदीकरणाचे काम करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता केवळ रस्त्याच्या रुंदीकरणाचेच काम केल्याने या दोनही पुलावरील रस्ता अरुंद असल्याने अरुंद अपघातांची संख्या वाढली आहे. यापूर्वी या पुलावरील अपघातात तिघांचे प्राण गेले असून, अनेकजन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच रात्री टेंपोचालकाला पुलाच्या रुंदीचा अंदाज न आल्याने टेंपो
नदीत पडून अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले असून, मोठी दुर्घटना टळली. या अपघाताच्या घटना सतत घडत असतानाही पुलाचे काम ठप्पच असून त्याकडे सबंधित विभागाचे दर्लक्ष आहे, अशी प्रतीक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. या दोनही पुलावरील अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करावे अशी मागणी चांदखेड ग्रामस्थांनी केली आहे.
१८९६२