औद्योगिक कचऱ्याचा प्रश्‍न ‘कचऱ्यात’
वायू प्रदूषणात वाढ ः विल्हेवाटीसाठी सक्षम यंत्रणेची गरज

औद्योगिक कचऱ्याचा प्रश्‍न ‘कचऱ्यात’ वायू प्रदूषणात वाढ ः विल्हेवाटीसाठी सक्षम यंत्रणेची गरज

पिंपरी,ता. ९ ः गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी- चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. शहरात सुरू असणारी बांधकामे, विकास कामे, देखभाल-दुरुस्तीची कामे ही प्रमुख कारणे यामागे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे काही लहान उद्योजक औद्योगिक घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत नसल्याने वायू प्रदूषणात भर पडत आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे, औद्योगिक घातक कचरा विल्हेवाटीसाठी सक्षम यंत्रणा अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अठरा जिल्ह्यांसाठी एकच प्रकल्प
रासायनिक व औद्योगिक घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेला ‘सीएचडब्लूटीएसडीएफ प्लॅट’ हा रांजणगाव येथे कार्यान्वित आहे. पिंपरी-चिंचवड शहरासोबतच अठरा जिल्ह्यांतील औद्योगिक घातक कचरा येथे जमा केला जातो. याठिकाणी कचऱ्याची वर्गवारी केली जाते. कचऱ्याच्या प्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच पर्यावरणाला धोका होणार नाही, अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र, शहरातील सर्वच उद्योग औद्योगिक घातक कचरा येथे पाठवतात का ? यावर देखरेख ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.

उद्योगांना परवाना; मात्र देखरेखीचा अभाव
ज्यावेळी उद्योगांना परवाना दिला जातो. त्यावेळी, त्यांच्याकडे उद्योगातून निर्माण होणाऱ्या विषारी घटकांची नोंद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात येते. त्यानुसार, या कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावली जाते का ? नेमून दिलेल्या एजन्सीकडे कचरा दिला जातो का ? यावर देखरेख करणे गरजेचे आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ नसल्याने ही देखरेख करणे शक्य होत नाही.

काय करायला हवे
- लहान उद्योग चालविणाऱ्यांना कोणत्या प्रकारचा कचरा तयार होतोय याची माहितीच नसते.
- त्यामुळे, हा कचरा भंगारात दिला जातो. त्यासाठी उद्योगांमध्ये जनजागृती करणे आवश्‍यक.
- एजन्सीकडे कचरा जमा करण्यासाठी आकारण्यात देणारे दर लघु व सूक्ष्म उद्योजकांना परवडत नाहीत.
- अशा उद्योगांची एकत्रितरीत्या नोंद केल्यास कचरा जमा करणे सोपे जाईल.
- औद्योगिक घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट केली जातेय का ? यावर सक्षम यंत्रणेव्दारे नियंत्रण ठेवणे गरजेचे.
- पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य शासन व स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकत्र येणे आवश्यक.

महाराष्ट्रात चार ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक घातक कचरा हा रांजणगाव ‘सीएचडब्लूटीएसडीएफ प्लॅट’ येथे पाठविला जातो. या प्रकल्पास ‘एमआयडीसी’ने आपली जागा नाममात्र दराने उपलब्ध करून दिलेली आहे. उद्योजकांनी कोणताही घातक कचरा याठिकाणी पाठविणे अपेक्षित आहे.
- संजय कोतवाड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

औद्योगिक घातक कचरा जमा कचऱ्यासाठी ठिकठिकाणी शिबिरे घेतली जातात. लहान उद्योगांकडून अगदी कमी प्रमाणातील कचराही घेतला जातो. मात्र, उद्योजकांनीही आपल्या उद्योगातून निर्माण होणाऱ्या कचरा ‘सीएचडब्लूटीएसडीएफ प्लँट’ कडेच देणे गरजेचे आहे. अनेकदा असे होताना दिसत नाही.
- मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ

औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट हा एक जटील प्रश्‍न आहे. याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही; तर भविष्यात गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. शहरातील परिस्थिती सुधारण्यासाठी एक समिती स्थापन करावी. त्यामध्ये प्रशासन, स्थानिक नेते, राज्य सरकार व पर्यावरण क्षेत्र यातील तज्ज्ञांचा समावेश असावा. हे सगळे एका व्यासपीठावर आले तरच आपण पर्यावरण वाचवू शकतो.’

- विश्‍वास पाटील, औद्योगिक सुरक्षा विभाग, फोरएशिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com