भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत ः वाघेरे

भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत ः वाघेरे

पिंपरी, ता. १० ः लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही खोट्या आश्वासनांना आणि भूलथापांना बळी पडायचे नाही, असा निश्चय मावळ लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी जनतेचा पाठिंबा मिळत आहे. मावळ लोकसभेत महाविकास आघाडीला संधी देवून, या निवडणुकीत परिवर्तन करण्याचे मतदारांनी ठरवलेलं आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.
वाघेरे म्हणाले, ‘‘देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकजुटीने या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. खास करून माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशावर मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता झटत आहे. धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झालेली आहे. आपली निवडणूक मतदारांनी हातात घेतलेली आहे. गावागावात फक्त फक्त मशाल पेटवण्याची भूमिका सर्व मतदारांनी घेतलेली आहे. म्हणूनच समोरच्या उमेदवाराला पराभवाची भीती वाटत आहेत. गद्दारीचा शिक्का पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरू
आहे.
वाघेरे म्हणाले, ‘‘विरोधक आता मी शिवसेनेसोबत कधी आलो, हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मला त्यांना एक सांगायचंय. त्यांनी ज्या पद्धतीने सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. पक्षाने दोनदा संधी दिलेली असताना आपला स्वार्थ साधून, ते पक्ष सोडून गेले. तसं मी केलेलं नाही. काल आणि आजही एकाच विचारांसोबत राहण्याचं काम आम्ही केलं. मी संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढू, ही भूमिका निवडली. समोर पराभव दिसत असल्यामुळे विरोधक वाट्टेल ते बोलायला लागलेत. एवढंच काय तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला हरविण्यासाठी त्यांना सेलिब्रिटी आणावे लागत आहेत. सगळं मंत्रिमंडळ मावळमध्ये त्यांचा प्रचार करायला दररोज येत आहे.’’
निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हे मंजूर केलंय. ते मंजूर केलंय. त्यासाठी निधी मिळाला, अशा फसव्या घोषणा ते करायला लागलेत. नुकतीच त्यांनी रेल्वेच्या चौपदरीकरणासाठी निधी आणल्याचा मोठा आकडा सांगितला. वास्तवात आम्ही माहिती घेतली, तर तसं काहीच झालेलं नाही. इतकं खोटं रेटून बोलायचं काम सध्या दिसतंय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने कशा पद्धतीने चुकीचा कारभार केला. हे शहराने पाहिलेलं आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवाससारख्या योजना शहरात फसल्या आहेत. त्यावर ते कोणीही तोंड उघडत नाहीत. सोसायट्यांच्या पाणीप्रश्नावर, आयटीतील नोकरदारांच्या प्रश्नावर ते बोलायला तयार नाहीत, असे वाघेरे यांनी सांगितलं.
संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्यानंतर मी पाहिलंय, की आता त्यांना काही करून देखील मताधिक्य मिळणार नाही. यावेळी आपलं मत मावळमध्ये परिवर्तनासाठी, देशाच्या भल्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी आणि गोरगरिबी, कष्टकरी, सामान्य नागरिकांच्या हितासाठी द्यायचे आहे, हे जाणून मावळमधील मतदारराजा प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करेल, अशी खात्री वाटत असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.
फोटो ः 18892

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com