हक्काचे विरंगुळा केंद्रच नाही; सातत्याने उपेक्षाच पदरी

हक्काचे विरंगुळा केंद्रच नाही; सातत्याने उपेक्षाच पदरी

आशा साळवी - सकाळ वृत्तसेवा
पिंपरी ता.२ : महिलांना व्यासपीठ मिळावे आणि वैचारिक देवाण-घेवाण व्हावी म्हणून पालवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यात आला. मात्र, गेल्या बारा वर्षांमध्ये हक्काचा विरंगुळा केंद्र नसल्याने महिला सभासदांचे वाढदिवस साजरे करता येत नाहीत. केंद्र नसल्याने खुर्च्या, टेबल अडचणी ठेवण्यास अडचणी निर्माण होतात. बंदिस्त खोलीची गरज आहे. जागा नसल्यामुळे अनेकदा महापालिकेने दिलेले साहित्य घेता येत नाही. सतरंजी, हार्मोनिअम, टीव्ही, खुर्च्या ठेवणार कुठे ? या बारा वर्षांत महिलांच्या पदरी उपेक्षाच पडल्याची कैफियत आकुर्डीच्या पालवी महिला ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी सकाळच्या ‘संवाद ज्येष्ठांशी’ या उपक्रमात मांडली.
यावेळी अध्यक्षा शोभा जोशी, सचिव नेत्रावती आंबुरे, उपाध्यक्ष मंगला पाटील, विजया कुलकर्णी, कुसुम काळभोर, दीपा चाफळकर, नलिनी करपे, सुशीला खाचणे, जयमाला भापकर, सरला साळुंखे, प्राची कोरडे, नीलिमा साधू, वंदना घोणे, चंद्रकला लाड, विजया चाफळकर, सुनीता कोकाटे आदी पदाधिकारी आणि सदस्या उपस्थित होत्या.

आकडे बोलतात
स्थापना - २७ - ७ - २०१२
सभासद संख्या- ६०
महिला संख्या - ६०

संघाचे उपक्रम
- निसर्ग सहल
- एकदिवसाची सहल
- विविध गुणदर्शन स्पर्धा
- भजनी स्पर्धा
- अंगत पंगत सहभोजन कार्यक्रम
- आरोग्य शिबिर
- महिलांचे वाढदिवस
- स्पर्धा वार्षिक सांगीतिक कार्यक्रम
- वर्धापन दिन कार्यक्रम
- भजन वर्ग

संघाचे वेगळेपण
महिला सभासद हे संघाचे वैशिष्ट्य आहे. चिंचवडगाव, आकुर्डी रेल्वे स्टेशन, मोरवाडी, प्राधिकरण, भेळ चौक, डांगे चौक अशा वेगवेगळ्या भागांतून महिला संघात एकत्र आल्या आहेत. दरवर्षी संघाची समिती सदस्य स्वखर्चाने वर्धापन दिन साजरा करतात. गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. तसेच बारा वर्षांत संघाच्या अध्यक्षा बदललेल्या नाहीत. महिलांचा संघ असूनही खुर्च्या करिता महिलांमध्ये भांडणे नाहीत. महिला स्वयंपूर्ण उपक्रम घेतात.

महिला ज्येष्ठांच्या समस्या...
कुसुम काळभोर म्हणाल्या,‘‘ महिलांना स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे’’
विजया चाफळकर म्हणाल्या,‘‘प्राधिकरणातील कबीरबाग जागेत २४ हेक्टरमध्ये बांधीव जागा आहे. त्याठिकाणी आम्हाला विरंगुळा केंद्र द्यावा.’’
सुशीला खाचणे म्हणाल्या, ‘‘आयुष्मान कार्डसाठी शिधापत्रिकाधारकांची अट नेमकी कोणासाठी आहे? हे स्पष्ट नसल्यामुळे लाभ घेता येत नाही.’’
मंगला पाटील म्हणाल्या, ‘‘आमचा महिलांचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, मात्र आम्हाला स्वच्छतागृहच नाही. त्यामुळे, महिलांची खूप गैरसोय होते.’’
अश्विनी कुलकर्णी म्हणाल्या,‘‘ उतारवयात उपचारांमध्ये सवलत मिळणे आवश्यक आहे, खासगी खर्च परवडत नाही.’’
नलिनी करपे म्हणाल्या,‘‘आयुष्मान कार्डावर अंमलबजावणी करण्यात दवाखाने उपचार देत नाहीत. ज्या रुग्णालयात योजना आहे. ते उपचार देण्यास टाळाटाळ करतात.’’
नीलिमा साधू म्हणाल्या,‘‘महापालिकेने वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी घेणे आवश्यक आहे.’’
प्राची कोरडे म्हणाल्या,‘‘विधवा महिलांना पेन्शन सुरू करावी. दरमहा हजार रुपये मिळावेत. श्रावणबाळ योजनांची माहिती द्यावी.’’
सरला साळुंखे म्हणाल्या,‘‘गाणी म्हणण्यासाठी हक्काचं जागा हवी आहे. विरंगुळा केंद्राची सोय करावी.’’
नेत्रावती अंभोरे म्हणाल्या,‘‘आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला
मिळालेल्या साहित्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जाते’’

‘‘गेल्या बारा वर्षांपासून एका खासगी जागेमध्ये आम्ही संघाचे कार्यक्रम आणि बैठका घेत आहोत. महिला सदस्यांना विरंगुळा केंद्र नसल्याने साहित्याची गैरसोय होते. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला मिळालेल्या साहित्यापासून आम्हाला वंचित ठेवले जाते. साहित्याची पळवा- पळवी केली जाते. काही प्रमाणात कुरघोड्या केल्या जातात.
- शोभा जोशी, अध्यक्षा, पालवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com