क्लासेस-कॉलेजची ‘हातमिळवणी’

क्लासेस-कॉलेजची ‘हातमिळवणी’

Published on

इंटिग्रेटेड कॉलेजांचे गौडबंगाल - भाग २

पिंपरी, ता. १४ : शहरासह उपनगरांत ठिकठिकाणी संलग्न (टायअप) कनिष्ठ महाविद्यालयांचे पीक फोफावले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या पैशांतून संबंधित महाविद्यालयांचे संस्थाचालक मात्र गब्बर होत आहेत. या प्रकाराला वैतागून इतर महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मूळ महाविद्यालयाने दाखला अडवून धरल्याने घुसमट सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाण्याची वेळ आली आहे.

पिंपरी, शाहूनगर, संभाजीनगर, निगडी प्राधिकरण, आकुर्डी अशा ठिकाणच्या बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी स्थानिक खासगी क्लासेसशी हातमिळवणी केली आहे. या विद्यार्थ्यांना क्लासला जावे लागत असल्याने प्रत्यक्ष महाविद्यालयाला उपस्थितीतून ‘सवलत’ देण्यात आली आहे. या प्रकारामुळे शेकडो विद्यार्थी महाविद्यालयाच्या पटावर असूनही प्रत्यक्षात काही महाविद्यालयांना या प्रकारामुळे पन्नास विद्यार्थीदेखील उपस्थित राहत नाहीत. ही स्थिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पाहिलीदेखील आहे. पण, हात बांधले गेले असल्याने ते काहीच कारवाई करत नाहीत. संलग्न प्रकारामुळे महाविद्यालयाला शिक्षक असूनदेखील विद्यार्थी आणि पालकांना महाविद्यालयाऐवजी खासगी क्लासेसला प्रवेश घेण्यास भाग पाडले जात आहे. या प्रकारामुळे पालकांना आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत आहे.
महाविद्यालयाला शिक्षक उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाऐवजी खासगी वर्गांत प्रवेश घेण्यास भाग पाडले जात आहे. एकीकडे लाखो रुपयांचे शुल्क भरता येणे शक्य नाही. तर, महाविद्यालयात तासिका होत नसल्याने शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, महाविद्यालयांकडूनही आपली पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी अडवणूक सुरू आहे.

शिक्षण विभाग जाब विचारणार का?
जेईई, अॅडव्हान्स जेईई, नीट, एनडीए, आयआयटी, एमएचटी-सीईटी आणि इतर स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या नावाखाली खासगी क्लासेससोबत ‘टायअप’ करणाऱ्या महाविद्यालयांकडून सामाजिक बांधिलकी पायदळी तुडविली जात आहे. ज्ञानाची भूक आपल्या महाविद्यालयात भागत नसल्यानेदेखील विद्यार्थ्यांना ‘टायअप’ महाविद्यालय किंवा इतर पर्याय नाइलाजाने स्वीकारावे लागत आहेत. काही महाविद्यालयांत तर कोणत्याही भौतिक सुविधा नसल्याचे वास्तव आहे. विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यासह पालकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या आणि प्रत्यक्ष कागदोपत्री विद्यार्थिसंख्या दाखविणाऱ्या महाविद्यालयांची तपासणी करून त्यांना शिक्षण विभाग जाब कधी विचारणार, असा सवाल पालक वर्गातून केला जात आहे.

अकरावी-बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित करणारा टप्पा आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाकडून व्यवहार्य मार्गदर्शनाची अपेक्षा असते. मात्र, तेथे सामाजिक बांधिलकीऐवजी व्यावसायिकतेची प्रचिती येते आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत कोणाचाच पायपोस नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- विक्रम काळे, प्राचार्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com