एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना बंद
पिंपरी, ता.२९ ः कोणत्याही ठोस कारणांशिवाय केंद्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद केली आहे. त्यामुळे, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सामाजिक सुरक्षा देण्यासह आर्थिक मदत करण्याकरिता केंद्र सरकारने नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर फाउंडेशनमार्फत २०१७-१८ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना केंद्र सरकारने १ एप्रिल २०२३ पासून बंद केली आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती - जमातीतील व्यक्तीने इतर कोणत्याही जातीत विवाह केल्यास त्या दाम्पत्याला अडीच लाख इतकी आर्थिक मदत दिली जात होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्न झालेल्या जोडप्यांकडे त्यांचे विवाह प्रमाणपत्र असणे गरजेचे होते. समाजातील जातीय तेढ कमी व्हावी, रोटी-बेटी व्यवहार वाढावा, आंतरजातीय विवाहांना सामाजिक मान्यता व आधार मिळावा हा योजनेचा हेतू होता.
लाभ देण्याची योजना बंद
राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर फाउंडेशन, नवी दिल्ली यांनी त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभ देणे बंद केले आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याबाबत अर्ज केला आहे. त्यांना राज्यस्तरीय आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. अशा लाभार्थ्यांना राज्यस्तरीय आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ नाकारणे संयुक्तिक नाही, असे शासनाने कळविले आहे. याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांची खात्री झाल्यास संबंधित लाभार्थी यांना राज्यस्तरीय आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ देणेबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.’’
सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविल्याची चर्चा आहे. समाजसुधारक फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांना हे तिलांजली देण्यासारखे आहे. हे अत्यंत अशोभनीय, निषेधार्ह आणि समाजविघातक कृत्य आहे. योजना बंद का करण्यात आली ? तिला पुनरुज्जीवित का केले जात नाही ? या संदर्भात कोणतीही अधिकृत अधिसूचना का जाहीर करण्यात आलेली नाही ?
- ॲड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड्स
पुणे समाजकल्याण विभागात माझ्या मित्रासह योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी ही योजना बंद झाल्याची माहिती दिली. ही माहिती ऐकून अतिशय वाईट वाटले. कारण ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे; तर जातीय सलोखा, सामाजिक समरसता व परिवर्तनासाठीचा एक प्रभावी पाऊल होती.
- नारायण चपके, वाकड, लाभार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.