लक्ष्मी चौकात वर्तुळाकार उड्डाणपुलाचा ‘उतारा’
पिंपरी, ता. २१ : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) येथील लक्ष्मी चौकात वर्तुळाकार उड्डाणपुलाची संकल्पना मांडली आहे. त्याची रचना कशी असेल, जागा किती लागेल, याची चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी ‘एमआयडीसी’ने विविध आराखडेही मागविले आहेत.
हिंजवडीतील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ‘एमआयडीसी’ने या वर्षाच्या सुरुवातीलाच तीन विविध प्रकल्पांचा प्रस्ताव मांडला होता. यात लक्ष्मी चौक येथील उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशानभूमी रस्त्याचे रुंदीकरण व हिंजवडी फेज-१ ते फेज-३ उड्डाणपूल या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी निविदाही काढण्यात आलेल्या होत्या. मात्र, भूसंपादन न झाल्याने जूनमध्ये ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक व उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीत केलेले दौरे यामुळे भूसंपादन सुरू करण्यात आली आहे.
आराखडा मंजुरीची प्रतीक्षा
‘‘लक्ष्मी चौकातील उड्डाणपूल ७२० मीटर लांबीचा असावा, असा प्रस्ताव होता. त्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र, वाहतुकीची समस्या, पुढील काही वर्षांमध्ये वाढणारी लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता निगडीतील भक्ती शक्ती येथीलप्रमाणे उड्डाणपूल विचाराधीन आहे. सध्या हा प्रस्ताव अगदीच प्राथमिक पातळीवर असून, त्यासाठी विविध आराखडे मागविण्यात आलेले आहेत. त्यातील एखादा मंजूर झाल्यानंतर भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल,’’ असे ‘एमआयडीसी’कडून सांगण्यात आले आहे.
उड्डाणपुलाची गरज
हिंजवडी फेज-तीन, फेज-दोनकडून मारुंजी, भूमकर चौक व पुढे डांगे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना लक्ष्मी चौकातूनच जावे लागते. तसेच मारुंजीकडून आयटी पार्कच्या फेज-एक व फेज-दोनकडे आयटीयन्सही या चौकातूनच जातात. या परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामांमुळे येथून अवजड वाहतूकदेखील सुरू असते. पावसाळ्यात येथे वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा फटका फेज-दोनकडून भूमकर चौकाकडे जाणाऱ्या नागरिकांना होतो. त्यामुळे या चौकात उड्डाणपूल झाल्यास चारही बाजूंनी येणारी वाहतूक योग्य पद्धतीने वळवली जाऊ शकते.
इतर दोन प्रकल्पांसाठी भूसंपादन सुरू
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्मशानभूमी रस्त्याचे रुंदीकरण व हिंजवडी फेज-एक ते फेज-तीन हा उड्डाणपूल या दोन प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सध्या ‘पीएमआरडीए’तर्फे राबविली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पांसाठीही निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचेही ‘एमआयडीसी’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंजवडीसह मारुंजीमध्येही शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे या भागांत वाहनांची वर्दळ वाढली आहे. फेज-दोन व फेज-तीनकडून भूमकर चौक, मारुंजीकडे जाणारे लोक, तसेच तिकडून येणारे लोकही लक्ष्मी चौकाचाच वापर करतात. त्यामुळे या चौकात आठवड्यातील सातही दिवस गर्दी असते. त्यामुळे या चौकात उड्डाणपूल गरजेचा आहे.
- श्रीकांत साळुंखे, आयटी अभियंता तथा रहिवासी, मारुंजी
मी रोज भूमकर चौकातून फेज -तीन मध्ये नोकरीसाठी जाते. फेज-३ कडे ये-जा करण्यासाठी लक्ष्मी चौकातून जाणे सोपे आहे. मात्र, येथे सकाळी आणि सायंकाळी कोंडी होते. परिणामी फेज-दोन ते भूमकर चौक हा प्रवास करायला खूप वेळ लागतो. या चौकात उड्डाणपूल होण्यासोबतच बाजूचे रस्तेही दुरुस्त केले, तर रहिवाशांना फायदाच होईल.
- योगिता भोळे, आयटी कर्मचारी तथा रहिवासी, भूमकर चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

