दुरुस्तीची कामे होऊनही गढूळ पाणी
पिंपरी, ता. २१ ः शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात त्रुटी राहू नयेत, दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आणि पिंपरी चिंचवडकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरविणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेने गुरुवारी (ता. २०) शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (ता. २१) पाणी पुरवठा विस्कळित झालाच, पण बहुतांश भागांत गढूळ आणि अशुद्ध पाणी आल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे नागरिकांना मनःस्तापाला सामोरे जावे लागले.
महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाने सेक्टर २३ मधील स्थापत्यविषयक कामे हाती घेतली. यात क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील स्थापत्य व विद्युत विषयक कामांचाही समावेश होता. त्यासाठी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी बंद ठेवण्यात आला. कामे पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी दाबाने पाणी सोडण्यात आले. सकाळीच कमी दाबाने आणि ते सुद्धा गढूळ पाणी नळाला आल्याने नागरिक त्रस्त झाले. सकाळी कामावर जाणारे नोकरदार, महाविद्यालयीन युवक, कर्मचारी, कामगार आदींना रोजची कामे करण्यात उशीर झाला. त्यामुळे अनेकांनी महापालिकेच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.
--------------
नळाला गढूळ पाणी आल्यामुळे सकाळी लवकर उठूनही घरातील कामे करता आली नाहीत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या घरातील सदस्यांना कार्यालयात वेळेत पोहोचता आले नाही. साठवून ठेवलेले पाणी स्वयंपाक करण्यासाठी वापरले, पण अंघोळ गढूळ पाण्याने करावी लागली.
- अर्चना सावंत, पिंपरी गाव
-------
आमच्या भागात आजच नाही तर रोज पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. दूषित पाण्याचा प्रश्न आहेच, पण पाणी उच्च दाबाने येत नाही. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. रोजची कामे करण्यास उशीर होतो. त्यामुळे मनस्ताप होतो. पाण्यासाठी रोजच झगडावे लागते.
- सुप्रिया परब, यमुनानगर
--------
सकाळी दूषित पाणी आल्यामुळे घरातील कामे उरकणे शक्य झाले नाही. दररोज मुलांना सकाळी शाळेत लवकर सोडावे लागते. पाणीच उशिरा आल्यामुळे त्यांचे वेळेत आवरता आले नाही. त्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यास उशीर झाला. घरातील सर्वच कामे रखडली.
- यमुना काळे, थेरगाव
------
स्वयंपाक आणि मुलांना तयार करण्यासाठी सकाळी लवकर उठले. नळाला अत्यंत काळे पाणी आल्यामुळे हिरमोड झाला. मुलांना अंघोळ घालून कसेबसे उरकून शाळेत पाठवावे लागले. घरात साठवून ठेवलेले पाणी सुद्धा संपले. आज दिवसभर पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली.
- अश्विनी शिंदे, ताथवडे
-------
जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीबाबत महापालिकेने काढलेले सूचनापत्र गुरुवारी सायंकाळी उशिरा मिळाले. पाणी येणार नाही, हे उशिरा कळाल्याने पाण्याचे नियोजन करणे शक्य झाले नाही. गुरुवारपासून शुक्रवारी २१) सायंकाळपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली.
- सुनील मडकीकर, सेक्टर २७, निगडी प्राधिकरण
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

