भात कापणी रखडल्याने जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला
सोमाटणे, ता. ३ : पावसामुळे रखडलेल्या भात कापणीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कापणी न झालेल्या भातावर जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने पिकाचे मोठे नुकसान होत असून, पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना रात्री बांधावर जाऊन राखण करावी लागत आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर मावळातील शेतकरी भात कापणीला सुरुवात करतात. कापणी केलेला भात शेतात वाळल्यानंतर लगेच झोडपणीचे कामही सुरू होते. मात्र, यावर्षी दिवाळीपूर्वीपासून सुरू असलेला पाऊस अजूनही सुरूच आहे. सततच्या पावसामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून भात कापणीचे काम ठप्प झाले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत जंगली प्राण्यांनी भात खाण्यासाठी ग्रामीण भागातील डोंगरालगतच्या शेतांकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पवनमावळात कुसगाव, ओवळे, दिवड, डोणे, पाचाणे, येलघोल, धनगव्हान तसेच आंदर मावळातील खांडी, सावळा, इंगळून, पिंपरी, कल्हाट, किवळे, भोयरे, माळेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भात कापला तर पावसाने भिजण्याची भीती आणि शेतात ठेवला तर जंगली प्राण्यांनी नुकसान करण्याची भीती अशा दुहेरी संकटात मावळातील शेतकरी अडकले आहेत. जंगली डुकरांसह इतर प्राण्यांचा वावर वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेताच्या बांधावर जाऊन हुसकावण्यासाठी पहारा द्यावा लागत आहे.
PNE25V64694
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

