तीन महिन्यांचे ८० टक्के धान्य वाटप पूर्ण
पिंपरी, ता. १० : शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वाटपाला गती मिळत असली, तरी काही भागांत अजूनही ही कार्यवाही अपुरी आहे. सध्या ८० टक्के धान्य पूर्ण झाले आहे. पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी पुरेल इतका धान्यसाठा शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पाठवला होता. तो जूनमध्येच भोसरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, पिंपरी, तसेच शहरातील इतर भागांतील दुकानदारांकडे पोचला होता.
भोसरी भागात आतापर्यंत सुमारे ८० टक्के, चिंचवड ९१ टक्के धान्यवाटप झाले आहे. तर, पिंपरीतही धान्य वाटप सुरू आहे. धान्य वाटपासाठी शासनाने दिलेला कालावधी जुलै अखेरपर्यंत होता. मात्र, अपूर्ण वाटपामुळे ही मुदत आपोआपच ऑगस्टपर्यंत पोचली आहे. आता या महिन्यात शिल्लक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दुकानदारांनी नागरिकांना संदेश, फोन कॉल आणि प्रत्यक्ष संपर्काद्वारे धान्य उचलण्यासाठी विनंती केली आहे. अनेक ठिकाणी लाभार्थी हळूहळू धान्य घेण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ठराविक दराने तांदूळ, गहू, साखर आणि डाळ यांचा साठा दिला जातो. पावसाळ्यात, रोजगार व हालचाल मर्यादित असल्यामुळे एकाच वेळी तीन महिन्यांचा साठा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरिकांना वारंवार धान्य दुकानांपर्यंत जावे लागू नये; तसेच पूर, पावसाचा अडथळा किंवा इतर आपत्तीजन्य परिस्थितीतही अन्नधान्याचा तुटवडा जाणवू नये, असे उद्दिष्ट या नियोजनामागे होते.
ऑगस्टअखेरपर्यंत शंभर टक्के धान्य वाटप पूर्ण व्हावे. नागरिकांनी आपला कोटा वेळेत उचलल्यास, केवळ वितरणाची गतीच वाढणार नाही तर पुढील महिन्यांसाठीच्या नियोजनालाही मदत होणार आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपले धान्य घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.