वाहन चालकांनो सांभाळून,
कुटुंब वाट पाहत आहे

वाहन चालकांनो सांभाळून, कुटुंब वाट पाहत आहे

Published on

भाष्य
---
दुचाकीस्वारांनो! सांभाळा;
कुटुंबीय वाट पाहताहेत

- मंगेश पांडे
कुटुंबातील एखादा व्यक्ती काही कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर तो घरी सुखरूप परत येईपर्यंत कुटुंबीयांच्या नजरा दाराकडे लागलेल्या असतात. त्या व्यक्तीची घरी कोणीतरी वाट पाहत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपण सुरक्षितरीत्या कसे घरी परत येऊ, हा उद्देश ठेवूनच विशेषतः दुचाकीस्वारांनी वाहन चालवायला हवे. पादचाऱ्यांनीही रस्त्याने चालताना पदपथांचा किंवा झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करायला हवा. तेही वळताना किंवा रस्ता ओलांडताना डाव्या व उजव्या बाजूला पाहून वाहन येत नाही ना, याची खात्री करायला हवी. कारण सध्या पावसाळा सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात वाहन आदळून अथवा मोठ्या वाहनाच्या धडकेने अपघात होत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही रस्ते अरुंद आहेत. मोठ्या वाहनांच्या टायरला चिकटून येणारा चिखल रस्त्यावर पसरतो. या चिखलावरून दुचाकी घसरूनही अपघात होत आहेत. शिवाय, लांब व अवजड वाहनांसह अरुंद रस्त्यावरून अथवा अतिरहदारीच्या रस्त्यावरून जाताना कोणत्याही प्रकारच्या वाहनाच्या पुढे जाताना (ओव्हरटेक करताना) घाही करू नका. अशा अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्यातही कुटुंबातील करती व्यक्ती अपघातात गेल्यास कुटुंबच पोरके होते. शिवाय, अनेक पालक अल्पवयीन मुलांना हौसेखातर किंवा कौतुक म्हणून वाहन चालवायला देतात. त्यातही दुचाकी असेल तर गांभीर्य आणखी वाढते. अपघात झाल्यास पश्चात्तापाची वेळ येते. त्यातून सावरायचा प्रयत्न केला तरी वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी आपणच स्वतः सावध व सजग राहणे आवश्यक आहे.
अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्ते व्यवस्थित असणे आवश्यक आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, घडलेल्या अपघातांचा मागोवा घेतल्यास मानवी चुकाच अधिक सापडतात. अशा घटनांमध्ये यंत्रणा दोषी दिसतेही मात्र, यंत्रणांमध्ये कितपत बदल होईल हे सांगता येत नाही. बदल झाल्यानंतरही अपघात थांबतील, हे निश्चित नाही. अशावेळी आपणच आपल्या जिवाचा विचार करून वाहन चालविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, समोरून येणारे, बाजूने जाणारे वाहन याचा विचार करून वाहन चालविणे आवश्यक आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी...
वाहतूक नियम, वेगमर्यादेचे पालन करणे, पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखणे, मद्यपान करून गाडी न चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, चुकीच्या बाजूने पुढे न जाणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे आवश्यक आहे. यासोबतच वाहनांची वेळोवेळी तपासणी करण्यासह सुरक्षित वाहन चालवण्याची सवय लावणे आणि रस्त्यावरील धोक्यांबद्दल जागरूक असणे देखील महत्त्वाचे आहे. वाहन चालविताना आजूबाजूला नीट पाहा. काही वेळा मुख्य रस्त्याच्या बाजूने छोट्या गल्ल्यांमधून अचानक वाहने येतात. आधीच समोरचा अंदाज घेतलेला असला, की आपण सजग राहतो. पटकन ब्रेक दाबावा लागला तरी आपण त्यासाठी तयार असतो. पावसाळ्यात अथवा इतर वेळी दुचाकीवरून जात असताना मोठ्या वाहनांच्या आजूबाजूने जाणे टाळावे. रस्ते निसरडे असतात. अथवा खड्यांचा अंदाज न आल्यास दुचाकी घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही घटना
- पुनावळे येथे बुधवारी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
- आळंदी-मरकळ रस्त्यावर भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, त्याचा बारा वर्षीय भाऊ जखमी आहे
- तळेगाव दाभाडे- चाकण मार्गावरील खालुंब्रे येथे भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
- पिंपळे सौदागर येथे ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
- मुळशीतील मारुंजी रोड येथे टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
----------

Marathi News Esakal
www.esakal.com