पवनमावळ परिसरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
सोमाटणे, ता. २ : तापमानात सततच्या बदलांमुळे पवनमावळ परिसरात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीची थंडी आणि दिवसा कडक ऊन अशा बदलत्या हवामानाचा ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी सर्दी, ताप व खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आढले येथे दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या किमान साठच्या पुढे जात असल्याचे चित्र आहे.
हा आजार टाळण्यासाठी दुपारच्या वेळी शेतातील कामे टाळावीत, सनकोट किंवा टोपीचा वापर करावा, थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे परिधान करावेत. तसेच पिण्याचे पाणी शुद्ध असावे. पुरेसा आहार ठेवावा. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे, असे आढले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

