

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ : सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चिखलीतील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षांच्या मुलीवर सात श्वानांच्या झुंडीने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मुलीला ८० पेक्षा जास्त टाके पडले होते. त्यानंतर बुधवारी जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीत एका महिलेवर श्वानाने हल्ला केला. यात महिलेच्या कडेवरील जेमतेम वर्षाचे बाळ खाली पडले. ती आणि बाळ जखमी झाले.
या पार्श्वभूमीवर शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवावर परिणामकारक नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. महापालिका दरवर्षी श्वानांच्या लसीकरणासाठी लाखो रुपये खर्च करीत असली, तरी अशा वाढत्या प्रकारांमुळे अधिक व्यापक उपाययोजनांची आवश्यकता व्यक्त होत आहे.
भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री बाहेर फिरणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. दर महिन्याला सरासरी एक ते दोन पेक्षा जास्त नागरिक कुत्रा चावल्याच्या तक्रारींसह रुग्णालयात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, यावर्षी एप्रिल ते जुलैपर्यंत १३ हजार ६१५ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला आहे. रस्त्यावरून जाताना पादचारी आणि दुचाकीस्वारांवर श्वानांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढल्याने महापालिका प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. भटक्या श्वानांची वाढती संख्या, निर्बिजीकरणाचे कमी प्रमाण, तसेच प्राण्यांबाबतच्या विद्यमान धोरणातील मर्यादांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले की, कलम २१ अन्वये जीवनाचा अधिकार यात ‘कुत्र्याच्या चाव्याच्या भीतीशिवाय सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार’ समाविष्ट आहे. मानवी सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राणी जन्म नियंत्रण नियमांची अंमलबजावणी नीट न केल्यामुळे समस्या वाढली असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
ही घ्या काळजी...
श्वान चावल्यासच नव्हे, तर चाटल्यास, नखांनी ओरबाडल्यास किंवा त्वचेवर कोणतीही जखम झाल्यासही तातडीने रेबीज प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. कुत्रा किंवा मांजरामुळे जखम झाल्यास ती साबण आणि स्वच्छ वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुवावी. त्यानंतर जवळच्या शासकीय किंवा महापालिका रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
श्वान चावण्याच्या घटना
- म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीवर सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला
- चिखलीतील मोरे वस्ती येथे एका तरुणावर सात कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला
२०१६-१७ : १०,५३३
२०२१-२२ : १३,८९२
२०२२-२३ : १८,५००
२०२३-२४ : २४,१६९
२०२४-२५ : २८,०९९
२०२५-२६ : ३८,००४
२०२६-२७ (एप्रिल-जुलै): १३,६१५
नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्याची कार्यवाही करत असतो. जुनी सांगवीची घटना कळताच तेथे एक पथक पाठवले आहे.
- डॉ. अरुण दगडे, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.