

Entertainment News : ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहाण्यासाठी नागरिकांना शहरांवर अवलंबून राहावे लागते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत थेट नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे भव्य लोकार्पण नुकतेच मुंबईत पार पडले. महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले, तर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिनेसृष्टीतील दीपक तिजोरी, दिग्दर्शक अभिजीत पानसे, विजू माने, समीर विद्वांस, आशिष बेंडे, सुबोध खानोलकर, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, पुष्कर जोग, विशाखा सुभेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.