
निळ्या-पांढऱ्या पाण्यात पावले तरंगवत बसलीस की पैंजण वाजत नाहीत अन् वारा तुझ्या बटांशी न लाजता खेळत असता आवाज होत नाही. तुझं लक्ष पाण्यातल्या पावलात. पाण्यात पाहत तुझे अवखळ डोळे निववत. तू हलकी हसतेस आणि एव्हाना झाडाआड ताटकळून अवघडलेली तिन्हीसांज जणू धप्पा द्यायला धावत येते. पाठोपाठच माईची हाक.
‘‘सुमे, मासोळ्या मोजून झाल्या असतील तर ये हो आत.’’ पाठोपाठ आजीच्या स्तोत्राचं बोबडं संस्कृत कानी पडतं आणि परत खुदकन हसू फुटतं. मग अलगद पावलं काढून तू जळातलं प्रतिबिंब एकसारखं स्थिर करत, संध्याकाळचे रंग डोळ्यात भरून घेत परसात येतेस. हटकून चाफ्याच्या फांदीला झुलतेस आणि देवघरातल्या घंटेच्या किणकिणीत पैंजणाचे स्वर मिसळून स्तोत्र म्हणत, पाय धुवून आत येतेस. दिवा लावताना आजीच्या हाताची सुरकुतीन सुरकुती इवल्या ज्योतीसवे थरथरते. लख्ख दिसते. ज्योत निरांजनात स्थिरावली की देव्हाऱ्यातले देव उजळतात.
अप्पामामानं देवघरात मोठ्ठा दिवा लावून घेतलाय, पण आजी सांजारती होईस्तोवर तो मुद्दाम लावत नाही. तिला दिव्याने उजळवलेले सोनेरी देव पाहायला आवडतात. ती म्हणे, ‘‘तिन्हीसांज आमच्या सुमाताईगत लाजरी असते. भस्सकन दिवा लावून तिला दचकवू नै. एकदा का डोळे मिचकावत घरभर फिरून रात्रीच्या अंधारात लपली सांजुली, की मग पाडा की तुमचा उजेड.’’ यावर अप्पामामा घरी असला तर मोठ्यांदा हसे. माई पण, प्रसादाचा साखरफुटाणा तोंडात टाकून उत्साहानं रात्रीच्या सैंपाकातला जिन्नस जाहीर करत असे.