

पाऊस म्हणजे निसर्गचक्राचा अविभाज्य घटक, अन्नदाता... पाऊस म्हणजे धमाल, मस्ती, भिजणे... पावसाळी सहली, पावसाची गाणी अशा अनेक आनंदी आठवणींसोबतच हा आपला जीवाभावाचा सखा... चिखल, तुंबलेले पाणी, उशिरा धावणाऱ्या लोकल, पूर अशाही काही गोष्टी आपल्यासोबत घेऊन येतो. कमी दाबाचा पट्टा, मोसमी वारे, कुठे किती पाऊस पडेल याचा अंदाज हे आपण दरवर्षीच ऐकतो; परंतु आपल्याला हे माहीत नसेल की पावसाच्या पाण्याची उपयुक्तता त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते आणि कधी कधी हा पाऊस माती, झाडे आणि एकूणच जीवनमान यासाठी घातकही ठरू शकतो. पावसाच्या पाण्यात जर आम्ल वस्तूंचे प्रमाण वाढले तर त्याची गुणवत्ता घसरते.