

Artificial Intelligence in Mathematics
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
सॅन फ्रान्सिस्कोतील एका प्रयोगशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेने दशकानुदशकं न सुटलेल्या एका गणिती कोड्याला नवे उत्तर दिले. ही कथा केवळ एका शोधाची नाही, तर मानवी बुद्धी, संशोधनाची दिशा आणि विज्ञानाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या नव्या युगाची सुरुवात आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमधील एका शांत संशोधन प्रयोगशाळेत, एका कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेलने अशी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली, जी गेल्या ऐंशी वर्षांत एकाही मानवी गणितज्ञाला जमली नव्हती. या मशीनने थेट ‘पॉल एर्डोस’ या गणिताच्या जगात अत्यंत आदराने घेतल्या जाणाऱ्या महान शास्त्रज्ञाचा एक जुना सिद्धांत खोटा ठरवला. त्यांनी मांडलेली समस्या दिसायला अतिशय सोपी होती : एका कागदावर कितीही बिंदू (ठिपके) ठेवा आणि त्या ठिपक्यांच्या किती जोड्यांमध्ये तंतोतंत ‘एक एकक’ (१ युनिट) इतके अंतर असू शकते, हे शोधा; पण गेल्या आठ दशकांपासून हा प्रश्न जगातील सर्वोत्तम बुद्धिवंतांना सतत हुलकावणी देत होता. अखेर, एका मशीनने स्वतःलाच एक वेगळा आणि योग्य प्रश्न विचारला आणि या जुन्या कोड्याचा निकाल लागला.
काही दिवसांपूर्वीच ‘ओपनएआय’ या संस्थेने जाहीर केलेल्या या यशाने जागतिक वैज्ञानिक जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे. यावर सुरू झालेली चर्चा आता केवळ शाळा-कॉलेजांच्या भिंतींपुरती मर्यादित राहिलेली नाही. जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आणि अभियंते निर्माण करणारा देश म्हणून भारतासाठी ही घडामोड जितकी अभिमानास्पद आहे, तितकीच ती विचार करायला लावणारीही आहे. आपण एका नवीन वैज्ञानिक युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत की ही माणसाच्या बौद्धिक वर्चस्वाच्या अंताची सुरुवात आहे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.