
अहमदाबाद अपघातामुळे विमान क्षेत्रातील प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, हे नाकारता येत नाही. बोइंगच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर आक्षेप घेतले गेले. मात्र, १४ वर्षांपासून उड्डाण करीत असलेल्या विमानसेवेचा ट्रॅक रेकॉर्डही पाहायला हवा. एअर इंडियाने आपली ‘ड्रीमलायनर’ विमाने जमिनीवर ठेवावी, अशी मागणी करणे योग्य वाटत नाही.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळून जवळपास २७५ जणांना जीव गमावावा लागला. अलीकडच्या काळातील हा भीषण अपघात आहे. या अपघाताचे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत. मात्र नेमके काय परिणाम होणार हे जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. जगभरात विमान अपघात झाल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला होता, यावरून त्याचा अंदाज लावावा लागेल. सिंगापूर एअरलाइन्स असो की कोरियन एअरलाइन्स, यांच्यासह जगभरातील अन्य विमान कंपन्यांचा अभ्यास करावा लागेल.
एकंदरीत आढावा घेतल्यानंतर आपल्याला असे आढळून येईल, की अशा प्रकारच्या अपघातानंतर संबंधित विमान कंपन्यांनी अशा घटनांतून स्वतःला सावरले. नव्याने झेप घेतली. मला खात्री आहे, की एअर इंडियाही इतर विमान कंपन्यांप्रमाणे नव्याने आकाशात भरारी घेईल. मात्र या दुर्घटनेत ज्यांनी आपले कुटुंबीय व नातेवाईक गमावले आहेत त्या सर्वांना एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरण्यास अजून कालावधी लागेल. या दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनाही जबरदस्त मानसिक आघात बसला आहे.