

Renewable energy storage India
esakal
ऊर्जा उपलब्धता ही भारतासारख्या विकसित होऊ पाहणाऱ्या देशांसाठीची सर्वांत महत्त्वाची गरज राहणार आहे आणि ऊर्जा संक्रमण ही हवामान बदलांचे संकट दूर ठेवू पाहणाऱ्या जगासाठीची वाढती गरज होत आहे. बॅटरीरूपात वीजसंचय करणारी व्यवस्था हे त्यावर उत्तर कसे ठरू शकते, याचा ऊहापोह.
सूर्य आणि त्यापासून मिळू शकणारी ऊर्जा यांसारखा या जगासाठी ऊर्जेचा अन्य स्रोत असूच शकत नाही. परंतु त्याकडे वळण्यासाठी खनिज इंधन स्रोत संपण्याची आपण वाट पाहू नये.
थॉमस एडिसन (विजेच्या दिव्याचे संशोधक)
खनिज इंधनाच्या स्रोतांकडून सौर आणि पवन यांसारख्या अक्षय ऊर्जेच्या पर्यायांकडे जग संक्रमण करत आहे. परंतु ही ऊर्जा साठवण्याच्या क्षमतेवर या प्रक्रियेचा वेग अवलंबून आहे. सूर्यप्रकाशाची ऊर्जा ग्रहण करणारे सौरपंखे किंवा वाऱ्याच्या झोताबरोबर चक्राकार फिरणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पांतील पाती काही एकसारख्याच सातत्याने आणि प्रमाणात त्या ऊर्जेची निर्मिती करू शकत नाहीत. त्यामुळे काही वेळा गरजेपेक्षा अतिरिक्त वीजनिर्मिती आणि गरजेच्या वेळी मात्र तिच्या उपलब्धतेचा अभाव अशी काहीशी विसंगती निर्माण होते. त्यातून वीजपुरवठ्याच्या जाळ्यांवर ताण येतो. बॅटरीरूपात वीजसंचय व्यवस्था (बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स) हे त्यावरील उत्तर आहे.