

Shah Rukh Khan IPL controversy
esakal
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या युगात वास्तव आणि आभास यातील सत्याचा शोध लागणे सोपे नाही. मनाला न पटणाऱ्या गोष्टींवरही सहज विश्वास ठेवला जातो इतका बेमालूमपणा त्यात भरला आहे. अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ अशा पद्धतीने तयार केले जातात, की हेच निर्विवाद सत्य असल्याचा आभास निर्माण केला जातो आणि तो जाणीवपूर्वक अधोरेखितही केला जातो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, कोणतीही चिकित्सक पडताळणी न करता, डोळे झाकून अशा माहितीवर विश्वास ठेवला जातो. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अज्ञानांचे विश्व काही कमी नाही. अशा विश्वात स्वतः केलेल्या चुकांनंतरही आपलेच उदात्तीकरण करायला लावून ‘एआय’सुद्धा फिके पाडणारी हुशारी असणारी कल्पकता मागे नाही... घटना आहे, बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमान याची ‘आयपीएल’मधून हकालपट्टी करायला लावणारी. त्यात टार्गेट झाला तो, अभिनेता आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाचा सहमालक शाहरूख खान. भारतासंदर्भात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा पाकिस्तान देश आपला पारंपरिक शत्रू आहेच; पण ज्या बांगलादेशला आपण त्यांच्याच जोखडातून स्वतंत्र केलं तोच आता आपल्याला नडण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेट रसिकांसाठी मायाजाल असलेल्या ‘आयपीएल’चा विचार करतो तेव्हा पाकिस्तानसाठी आपण कधीच दरवाजे बंद केलेले आहेत; पण आजमितीला आपल्या शत्रूंच्या यादीत बांगलादेशही आहे... कारण शेख हसिना यांचे सरकार उलथवल्यानंतर त्यांना भारतात आश्रय देण्यात आला आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये आपल्या देशाविरोधात कारवाया सुरू झाल्या.