bacchu kadu
esakal
बच्चू कडू
Bacchuprahar41@gmail.com
आज इतक्या वर्षांनी १९९४ सालची बेलोरा ग्रामपंचायतची निवडणूक मला अजून स्वच्छ आठवते. ती माझ्या आयुष्यातली थेट सामान्य जनतेतील पहिली निवडणूक होती; पण काय सांगू, निवडणूक जरी ग्रामपंचायतीची होती तरी गावातलं वातावरण बघून वाटायचं की जणू काही लोकसभा चाललीय! मी तेव्हा वॉर्ड नंबर तीनमधून उभा होतो. सोबत सुरेशराव विधाते आणि येणूबाई पचारे याही निवडून आल्या.
आमची ग्रामपंचायतची बॉडी तेरा सदस्यांची होती. त्या काळात ग्रामपंचायतीत कर्मचारी म्हणून दादारावजी ठाकरे, पुंजाजी राणे आणि पाणीपुरवठ्याचे काम प्रकाशराव झगडे पाहायचे. गावातले वातावरण एवढं रंगात आलं होतं, की निवडणुकीला सगळे मातब्बर लोक उभे होते. साहेबरावजी गणोरकर हे शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख, रामरावजी वानखडे आरपीआयचे तालुकाप्रमुख, अरुणाताई सुभाषराव देशमुख सिनेसृष्टीतल्या सेन्सॉर बोर्डच्या सदस्य, सुरेशराव विधाते हे काँग्रेसचे मोठे पदाधिकारी होते आणि मी स्वतः त्या वेळी भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुकाप्रमुख. सर्व राजकीय व सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू हे बेलोरा होतो. एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या गर्दीत ही आमची ग्रामपंचायतची निवडणूक झाली.