

BJP Election Success
esakal
२०२५ हे वर्ष भारतीय जनता पक्षासाठी विशेषतः अत्यंत यशस्वी ठरले. या वर्षात भाजपने सलग निवडणूक विजय नोंदवत प्रथम दिल्ली आणि त्यानंतर बिहारमध्ये सत्ता मिळवली. हे विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण दिल्लीमध्ये तब्बल एका दशकापासून (२०१५–२०२५) सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा (आप) पराभव करण्यात भाजपला यश आले. दिल्लीतील हा विजय भाजपसाठी विशेष महत्त्वाचा होता. कारण २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने अभूतपूर्व यश मिळवत एकूण ७० पैकी अनुक्रमे ६७ आणि ६३ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत ‘आप’ला पराभूत करणे हे भाजपसाठी मोठे राजकीय यश मानले जाते.
बिहारमधील विजयही तितकाच निर्णायक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) महागठबंधनाला (एमजीबी) जवळपास ९ टक्के मतांनी मागे टाकत दणदणीत विजय मिळवला. जागांच्या बाबतीत ‘एनडीए’ने २०२ जागा जिंकल्या, तर ‘एमजीबी’ला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूकपूर्व काळात मोठ्या अपेक्षा निर्माण करणाऱ्या आणि जोरदार चर्चा घडवून आणणाऱ्या ‘जन सुराज पार्टी’ला मात्र सपशेल अपयश आले. या पक्षाला अवघी ३.३ टक्के मते मिळाली आणि तो एकही जागा जिंकू शकला नाही. भाजपने केवळ दोन मोठे निवडणूक विजयच मिळवले असे नाहीत, तर पक्षातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्नही सोडवला. भाजपने नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती केली. हा मुद्दा पक्षात बराच काळ चर्चेत होता. एकूणच पाहता, २०२५ हे वर्ष भाजपसाठी अत्यंत सकारात्मक आणि यशस्वी ठरले, असे म्हणावे लागेल.