

पांडुरंग म्हस्के
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले, त्यामुळे वैधानिक सोपस्कार पार पाडण्यात राज्य सरकार यशस्वी झाले असले, तरी या अधिवेशनातून राज्याला काय मिळाले हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. ‘औरंगजेबाची कबर ते कामरा व्हाया दिशा सालियन’ आणि ‘हिंदू-मुस्लिम विद्वेष’ असेच या अधिवेशनाचे फलित राहिले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला केवळ राजकीय सर्कस पाहण्याचा आनंद मिळाला, असेच म्हणावे लागेल.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत गेलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाऐवजी राजकीय वगनाट्य सादर करीत आहेत, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटल्यास नवल नाही. विधानसभा अधिवेशनात चर्चा, वादविवाद, संघर्ष, आरोप-प्रत्यारोप, शेरे-ताशेरे होऊनही त्यात सामान्य जनता आणि त्यांच्या प्रश्नांचे प्रतिबिंब फारसे दिसले नाही.