

डॉ. श्रीमंत कोकाटे
shrimantkokate1@gmail.com
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणारा कुत्र्याचा पुतळा हटवावा, अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी २२ मार्च २०२५ रोजी शासनास पत्र दिले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात रायगडावरील कुत्र्याच्या पुतळ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. कुत्र्याचा पुतळा काढावा की नको, याबाबत मतमतांतरे आहेत. एक पक्ष असा दावा करतोय, की शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लाडक्या कुत्र्याने त्यांच्या चितेत उडी टाकली होती. त्या स्वामीनिष्ठ कुत्र्याचे स्मारक रायगडावर असावे... दुसरा पक्ष म्हणतोय, की अशा कोणत्याही कुत्र्याने छत्रपती शिवाजीराजांच्या चितेत उडी टाकलेली नाही. ही घटना अनैतिहासिक आहे. त्यामुळे तो अनैतिहासिक पुतळा हटवावा, अशी मागणी जोर धरत आहे. खरेच असा काही कुत्रा रायगडाच्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूशी संबंधित होता का, याबाबत ऐतिहासिक साधने काय सांगतात ते प्रथमतः आपण पाहू.