

History of Chess in India
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com
डीप ब्लूनं एक अशी चाल खेळली की कास्पारोव्ह गोंधळूनच गेला. ती चाल मशिननं खेळली आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला वाटलं, कदाचित संगणकाच्या मागे बसलेल्या मानवी तज्ज्ञांनी डीप ब्लूला खेळायला मदत केली असावी. पण तसं नव्हतं. डाव जसजसा पुढे गेला तसतसा कास्पारोव्ह अस्वस्थ होत गेला. शेवटी त्यानं तो डाव गमावला. नंतर कास्पारोव्हनं अनेकदा सांगितलं की त्या डावानंतर त्याचा आत्मविश्वास हादरला होता. त्याला मशिनच्या क्षमतेबद्दल शंका नव्हती; पण त्याला समजेनासं झालं होतं की मशिन नेमकं कसं विचार करतंय.
बुद्धिबळ हा जगातला सगळ्यात जुना आणि सर्वात बौद्धिक खेळ मानला जातो. आज तो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धी यांच्या स्पर्धेचं प्रतीक बनला आहे. पण या खेळाची सुरुवात साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारतात झाली होती, हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल.
इ.स. ६ व्या शतकाच्या आसपास भारतात ‘चतुरंग’ नावाचा खेळ खेळला जायचा. सैन्याच्या चार विभागांचं – पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि रथ यांचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळ पुढे पर्शियात गेला. तिथे त्याचं नाव ‘शतरंज’ पडलं. नंतर अरबांनी तो युरोपमध्ये नेला आणि हळूहळू त्याचे नियम बदलत गेले. १५ व्या शतकात आधुनिक बुद्धिबळ तयार झालं. पुढे युरोपमध्ये त्याच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि जगज्जेते निर्माण व्हायला लागले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात एक नाव संपूर्ण बुद्धिबळविश्वावर राज्य करत होतं – गॅरी कास्पारोव्ह. अनेकांच्या मते तो इतिहासातला सर्वात महान बुद्धिबळपटू होता आणि आहे.