

Future of artificial intelligence
esakal
मृत्यू... या अडीच अक्षरी शब्दात भीती, गूढ आणि अपरिहार्यता दडलेली आहे! माणूस म्हणून जन्माला आल्यावर एकच गोष्ट ठरलेली असते, ती म्हणजे आपला मृत्यू! पण विज्ञानानं या निसर्गनियमालाच आव्हान दिलं तर? तुमचं शरीर जळून खाक होईल, पण तुमचा आवाज, विचार, ‘व्यक्तिमत्त्व’ या जगात कायम जिवंत राहील...’’ तर? क्षणभर हे एखाद्या सायन्स फिक्शनचं कथानक वाटेल, पण आज स्मार्टफोन, इंटरनेट आणि अफाट वेगानं वाढणारी कृत्रिम बुद्धिमत्ता यांनी आपल्याला अशा एका वळणावर आणून उभं केलंय, जिथे ‘डिजिटल अमरत्व’ ही कल्पना चक्क शक्य होणार आहे!!
प्रसिद्ध अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ प्रोफेसर मिचिओ काकू यांचं एक वाक्य सध्या जगभरातल्या विचारवंतांची झोप उडवतंय. ते एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘We will achieve digital immortality.’ म्हणजे आपण डिजिटल अमरत्व नक्कीच साध्य करू. त्यांच्या म्हणण्याचा साधा सरळ अर्थ असा की, आपलं हाडामांसाचं शरीर हे नश्वर आहे, ते संपेल; पण आपलं मन, आपल्या आठवणी आणि आपल्या स्वभावाचे कंगोरे सायबरस्पेसमध्ये अनंत काळासाठी जिवंत राहतील. कल्पना करा, तुमची लाडकी आजी आज हयात नाहीये. पण तुम्हाला तिची खूप आठवण येतेय. आता नवीन तंत्रज्ञानामुळे तुम्ही लॅपटॉप उघडला तर स्क्रीनवर आजीचा चेहरा दिसेल, अगदी जिवंत वाटावा असा. तुम्ही म्हणता, ‘‘आजी, आज खूप एकटं वाटतंय ग...’’ आणि समोरून आजीच्याच आवाजात, तिच्याच खास हेलकाव्यात उत्तर आलं, ‘‘अरे राजा, मी आहे ना... का काळजी करतोस?’’ आणि मग सुरू होईल तोच जुना संवाद. हा केवळ रेकॉर्ड केलेला मेसेज नसेल, तर ती तुमच्या प्रश्नानुसार, तुमच्या मनःस्थितीनुसार आजीनं दिलेली ‘रिअल टाइम’ प्रतिक्रिया असेल. हे वाचताना अंगावर काटा येतोय ना? थोडं सुखावह, पण तितकंच भीतीदायक वाटतंय ना? हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं हे समजून घेणं जितकं रंजक आहे, तितकंच ते भविष्याचा वेध घेणारं आहे.