

Financial Freedom for Youth
esakal
प्रा. कौस्तुभ खोरवाल - sakal.avtaran@gmail.com
आपण सर्व भारतीय स्वातंत्र्यदिनी अभिमानाने तिरंगा फडकवतो. अनेक कार्यक्रम आयोजित करतो. मात्र, आपण सर्वांनीच विशेषतः आजच्या तरुणांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प करायला हवा. कारण देशातील तरुण वर्ग हा आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तरुण मुला-मुलींनी कमाईसोबत बचत, गुंतवणूक, आर्थिक साक्षरता आणि संपत्तीनिर्मितीची शिस्त आत्मसात केल्यास त्याचा लाभ केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे; तर संपूर्ण अर्थव्यवस्थेलाही होईल.
भारतातील स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. पण, आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांनी मिळवायचे असते. आज घेतलेला एक छोटा आर्थिक निर्णय उद्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे पहिली गुंतवणूक किती मोठी आहे यापेक्षा ती किती शहाणपणाने, नियमितपणे आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून केली जाते, हे अधिक महत्त्वाचे असते. कारण, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे; तर आपल्या आर्थिक निर्णयांवर स्वतःचे नियंत्रण असणे, हेही खरे स्वातंत्र्य आहे. साहजिकच जीवनातील आर्थिक स्वातंत्र्याबाबत जागरूक राहणे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आजचा तरुण वर्ग नोकरी किंवा व्यवसाय सुरू करताच अधिक प्रमाणात खर्च करायला लागतो. त्यांच्या मनात आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याची भावना निर्माण होते. पण, आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी पैशाला योग्य दिशा देऊन भविष्यातील गरजांसाठी नियोजन करणे गरजेचे असते. आर्थिक स्वातंत्र्याचा उगम योग्य गुंतवणूक पर्याय निवडीवर अवलंबून असतो. सध्या गुंतवणूक म्हटल्यावर इक्विटी (शेअर) मध्ये पैसा गुंतवणे, असा एकच अर्थ घेतला जातो. भारतात हमी परतावा देणाऱ्या सरकारी गुंतवणूक योजनादेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुण वर्गाने (वय वर्ष ३५ पर्यंत) विविध गुंतवणूक पर्यायांचा योग्य विचार करून पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. थोडक्यात, गुंतवणूक स्वातंत्र्य म्हणजे कोणीतरी सांगितले म्हणून पैसा गुंतवणे नव्हे; तर स्वतः समजून घेऊन निर्णय घेणे.