

Financial Independence
esakal
डॉ. अमेय खरे - ameykhare97@gmail.com
भा रताच्या स्वातंत्र्याला यंदा ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाने आर्थिक विकास, तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनात मोठी झेप घेतली आहे. मात्र, विकसित भारताचे स्वप्न केवळ वाढत्या ‘जीडीपी’ने पूर्ण होणार नाही. त्यासाठी प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुरक्षित आणि स्वावलंबी असणे तितकेच आवश्यक आहे. उत्पन्न वाढणे ही प्रगतीची सुरुवात असली, तरी भीतीऐवजी आत्मविश्वासाने आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच खरे आर्थिक स्वातंत्र्य. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीय कुटुंबाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, आपण आर्थिकदृष्ट्या खरोखर स्वतंत्र आहोत का?
भारताने गेल्या सात दशकांत अन्नसुरक्षेपासून आर्थिक उदारीकरणापर्यंत आणि डिजिटल क्रांतीपासून जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्यापर्यंत उल्लेखनीय प्रवास केला आहे. आर्थिक संधी वाढल्या, बँकिंग सेवा घराघरांत पोहोचल्या आणि गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. तरीही प्रत्येक भारतीय कुटुंबासमोर एक मूलभूत प्रश्न कायम आहे, आर्थिक सुरक्षिततेचा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘फायनान्शियल इन्क्लूजन इंडेक्स २०२५’नुसार मार्च २०२५ मध्ये देशाचा आर्थिक सर्वसमावेशन निर्देशांक ६७ वर पोहोचला, म्हणजेच अधिकाधिक नागरिक बँकिंग, विमा, पेन्शन आणि गुंतवणुकीसारख्या औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडले जात आहेत. हा सकारात्मक बदल असला, तरी आर्थिक सेवांचा वापर आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कल्पना करा, की पुढील सहा महिन्यांसाठी तुमचे नियमित उत्पन्न थांबले. घरखर्च, गृहकर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण किंवा अचानक उद्भवलेला वैद्यकीय खर्च याचा सामना तुमचे कुटुंब किती निर्धास्तपणे करू शकेल? या प्रश्नांची उत्तरेच एखाद्या कुटुंबाच्या आर्थिक स्वातंत्र्याचे खरे मोजमाप ठरतात.