

Netoji Palkar Adilshahi Campaigns
esakal
अनिकेत यादव इतिहास अभ्यासक
जावळी व वाई येथील शत्रूसैन्याचा निःपात करून शिवाजीराजांनी आपल्या सैन्यतुकड्या आदिलशाही मुलूख पादाक्रांत करण्यासाठी पाठविल्या. नेतोजींची घोडदळाची तुकडी कृष्णेच्या पट्ट्यात पाठविण्यात आली. पायदळाची तुकडी घाटमाथ्याजवळील ठाणी घेण्यासाठी धाडण्यात आली. तिसरी पायदळ व घोडेस्वारांची संयुक्त तुकडी कोकणात पाठविली गेली. तर एका तुकडीचे नेतृत्व महाराजांनी स्वतः करून थेट पन्हाळा गाठला.
सुपे, पुणे इ. प्रांतावर ताबा ः वाईला आल्यानंतर अफजलखानाने सुपे, शिरवळ, सासवड, पुणे या प्रांतांवर अनुक्रमे कल्याणजी यादव (जाधव), नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे (खराडे), सिद्दी हिलाल यांना पाठवून तो प्रदेश जिंकला होता. अफजलखान ठार झाल्याने धैर्य गळाल्यामुळे सिद्दी हिलाल (खेळोजींचा क्रीतपुत्र) याला पुढे करून हे सर्व आदिलशाही सरदार शिवाजीराजांना सामील झाले व त्यायोगे तो प्रदेश देखील पुनश्च स्वराज्यात सामील झाला.
नेतोजींच्या मोहिमा ः नेतोजींची ७००० घोडेस्वारांची तुकडी ११ नोव्हेंबरच्या सुमारास वाईहून निघाली. कृष्णेच्या काठाने पुढे आग्नेयेस सुमारे २० कि.मी. वरील चंदन व वंदन किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. (किल्ले जिंकण्यास वेळ जात आहे हे पाहून पुढे वेढा उठविण्यात आला) वेढ्यासाठी काही सैन्य ठेऊन ते वर्धनगडाकडे निघाले. वर्धनगडाजवळच्या चिमणगाव येथे खटाव परगण्याचा आदिलशाही सरदार फडतरे याच्यासोबत त्यांचा संघर्ष झाला. येथून ५०० होनांची वसुली करून एक तुकडी पूर्वेला नेर, खटाव, म्हसवड व वेळापूरला पाठविली. म्हसवड परिसरात गेलेल्या सैन्याची गाठ माण दहिगाव परगण्यातील आदिलशाही सैन्यप्रमुख रताजी माने याच्याशी पडली. त्यांच्यात हातघाईची लढाई होऊन मराठ्यांनी माघार घेतली व वेळापूरकडे कूच केले. वेळापूरहून ही तुकडी पुन्हा माघारी फिरून मुख्य सैन्याला येऊन मिळाली.