
Gen Z Social Media addiction
esakal
तुम्ही ‘५५५’चा नियम ऐकला असेल. असं म्हणतात की ५ किंवा त्याहून कमी माणसं आपल्या सर्वांत जवळच्या वर्तुळात असतात, जी रोज भेटतात. ५० माणसं आपल्या दुसऱ्या वर्तुळात असतात ज्यांच्याशी अधूनमधून संवाद होतो. आणि ५०० माणसांना आपण ओळखतो, तथापि ती क्वचित भेटतात. याला ५००० हून अधिक अशी संख्येची भर घालावीशी वाटते, जी माणसं सोशल मीडियावरून आपल्या संपर्कात असतात. त्यांच्याशी भेट होत नाही, परंतु आपल्या सामाजिकतेचा महत्त्वाचा भाग ती माणसं असतात. याच सोशल मीडियाचा वापर अचानक कोणावरही मनाविरुद्ध थांबवला गेल्यास त्याचे तीव्र पडसाद उठणारच कारण त्यात समाजापासून, जगापासून तुटल्याची भावना आहे.
आजच्या माणसाचं त्यावरचं अवलंबित्वच इतकं तयार झालेलं आहे की करमणूक, आनंद, संवाद, माहिती, गॉसिप, मैत्री, प्रेम, राग, दु:ख अशा असंख्य गरजा पुरवण्यासाठी माणसं सोशल मीडिया वापरतात. काही तास मोबाईलपासून दूर झालं की अस्वस्थ होणारे, रात्रभर स्क्रीनकडं बघत बसणारे, अभ्यासाऐवजी सतत नोटिफिकेशन्स तपासणारे तरुण मोठ्या संख्येने दिसतात. या बदललेल्या जीवनशैलीचा स्वीकार करणं आणि तरीही दुष्परिणामांबद्दल मुलांशी बोलत राहणं, त्यांचं म्हणणं समजून घेणं, आपलं त्यांना सांगणं, हे घडत राहायला हवं. हा संवाद शांतपणे करणं हे पालक, शिक्षक आणि समाज म्हणून खूप महत्त्वाचं ठरतं.