

The Transformation of Indian Weaving Under Islamic Rule
E sakal
Indian Textile History: From Ancient Guilds to Mughal Workshops
आतापर्यंत आपण साधारण बाराव्या शतकापर्यंतचा भारतीय वस्त्रकलेचा इतिहास पाहिला. इतिहास कधीच एकपदरी नसतो आणि कुठलीही कला ही सतत उत्क्रांत होत राहिली तरच टिकून राहते. भारतीय वस्त्रकलेचेही तसेच आहे. भारतीय विणकरांचे ज्ञान कधीही साचून राहिले नाही. त्यांची कला नेहमी आसपासच्या जगाशी संवाद साधत राहिली, नवे प्रभाव स्वीकारत राहिली आणि काळाबरोबर स्वतःला बदलत राहिली.
प्राचीन भारतात विणकरांच्या संघटना स्वतंत्रपणे काम करत असत आणि त्यांच्या उत्पादनावर केवळ त्यांचाच अधिकार होता. ह्या काळात भारतात कारागिरांकडे पैसाही होता आणि त्यांना समाजात प्रतिष्ठाही होती, जी त्यांच्या कामाच्या स्वायत्ततेतून लाभली होती. ही श्रेणी व्यवस्था साधारण सतराशे वर्षे भारतात टिकून राहिली.
कॉमन ईराच्या बाराव्या शतकात भारतावर पहिले यशस्वी इस्लामी आक्रमण झाले. सोळाव्या शतकापर्यंत भारतात इस्लामी सत्तेने चांगलेच पाय पसरले होते. चार शतकांच्या दीर्घ इस्लामी राजवटींमुळे भारतीय वस्त्रकलेवर जो परिणाम झाला, तो सखोल, दीर्घकालीन आणि अत्यंत गुंतागुंतीचे होता. इस्लामी राजसत्ता ह्याआधी भारतात सत्तेवर असलेल्या राजसत्तांहून खूप वेगळी आणि विलासी होती. इस्लामी दरबारातल्या सुलतान आणि सरदार दरकदारांना उंची वस्त्रांचा, छानछोकीचा शौक होता. त्यामुळे भारताच्या वस्त्रपरंपरेची दिशा बदलली.