

Origin Of Human Discrimination
esakal
पृथ्वीतलावर आजवर मानवाची, कृमींची, प्राणिमात्रांची अनादी अनंत कुळे जन्माला आली आणि नष्टदेखील झाली; पण त्यात भेद निर्माण केले ते केवळ माणसानेच. यातून त्याने स्वतःसाठी एका निद्रिस्त अवकाशाची निर्मिती केली. त्यात प्राणी-पक्षी आहेत, झाडे, डोंगर, नद्या-नाले आणि असंख्य जीवांची भरमार आहे; मात्र माणूसपण कुठेच नाही. कारण इथला माणूस रंग, रूप, वर्ण, भाषा, प्रदेश अन् धर्मावरून वाटला गेलाय.
आपल्यात भेद व्हायला नेमकी केव्हा सुरुवात झाली. म्हणजे माणूसपणाची जाणीव झाल्यानंतर आपल्यात काहीतरी विशिष्ट फरक आहेत, हे माणसाला केव्हा कळले याचा काही अंदाज बांधता येतोय का? आज आपल्या सभोवतालचे वातावरण पाहिले तर त्यात विषमतेची अनेक बीजे पेरली गेल्याचे आपल्याला जाणवते. रंग-रूप, जात-धर्म, गरीब-श्रीमंत, प्रदेश-भाषा अशा अनेक विषयांवरून आपण आपलीच वर्गवारी करून टाकलेली आहे. मुळात ही भेदा-भेदाची लागण ही काही आपली अलीकडची भानगड नाही. एकमेकांविषयीच्या संदेहाचे हे असह्य अवजड ओझे घेऊनच आपण उत्क्रांतीची पाऊलवाट चालत आलो आहोत. तसे पाहिले तर प्रत्येक माणूस निराळाच असतो. काही जणांमध्ये असते थोडेफार साम्य; पण तरी प्रत्येक माणूस वेगळाच, युनिक असतो. निसर्गानेच त्याला तसे घडवलेले असते. जशी परिस्थिती तसा तो घडत आणि बिघडत जातो. हा मानवी देह म्हणजे जणू साडेतीन हातांचे ओल्या मातीचे पोतेच. क्षणात तो आपण देऊ तो आकार घेतो आणि प्रसंगी मातीमोलही होतो; पण इतके क्षणभंगुर आयुष्य असतानाही माणूस इतका अहंमन्य आणि बुद्धिगर्वी का होतो, हा प्रश्नच आहे. माणसाच्या स्वतःला विशिष्ट आणि इतरांना दुय्यम समजण्याच्या ईर्ष्येतूनच कदाचित तो भेद करायला शिकला असावा. मी आणि तू, आम्ही आणि तुम्ही, आपले आणि परके, जात-धर्म-वंश-वर्ग असे आज आपण आपलेच मानसिक विभाजन केले आहे. प्रत्येक गट आपल्या वर्गीकरणाचे वेगळे कारण देतो. कुणाचे कारण धार्मिक आहे; तर कुणाचे वांशिक... पण प्रत्येकाकडे स्वतःचे असे कारण आहे; पण इथे आपल्याला त्या कारणांच्या गुंत्यात अडकायचे नाही; तर त्याचे मूळ शोधायचे आहे. ते कारण आपल्याला उत्क्रांतीच्या प्रवासात नक्कीच सापडेल, यात शंका नाही.