

India Industrial Superpower
esakal
डॉ. अनंत सरदेशमुख, व्यवस्थापन, उद्योग, उद्योजकता व स्टार्टअप मार्गदर्शक
स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना केवळ एक उत्पादन केंद्र न राहता, जागतिक औद्योगिक आणि तंत्रज्ञानात्मक क्रांतीचे नेतृत्व करणारी महासत्ता बनणे हेच २०४७ मधील भारताचे ध्येय असले पाहिजे.
२०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करू. या शंभर वर्षांच्या प्रवासात भारताने कृषिप्रधान आणि औद्योगिकदृष्ट्या मागास देशापासून जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास केला आहे. मात्र, आता प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. पुढील दोन दशकांत भारत खऱ्या अर्थाने औद्योगिक महासत्ता बनेल का? भारताची औद्योगिक परंपरा प्रत्यक्षात अत्यंत प्राचीन आहे. वस्त्रोद्योग, धातुशास्त्र, जहाजबांधणी आणि हस्तकला या क्षेत्रांत भारताने युरोपीय औद्योगिक क्रांतीच्या अनेक शतकांपूर्वीपासून जगाला दिशा दिली होती. बंगालचे मलमल, गुजरातचे रंगीत कापड आणि दक्षिण भारतातील धातुकाम यांना जगभर मोठी मागणी होती. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक उत्पादनात भारताचा वाटा जवळपास एक चतुर्थांश होता, अशा नोंदी आढळतात. मात्र, ब्रिटिश वसाहतवादी धोरणामुळे औद्योगिक परंपरा उद्ध्वस्त झाली. भारतातून कच्चा माल इंग्लंडला पाठवून तेथे तयार झालेला माल पुन्हा भारतीय बाजारपेठेत विकला गेला. परिणामी पारंपरिक हातमाग उद्योग कोलमडला व भारत कच्चा माल पुरवणारा कृषिप्रधान देश बनला. १९४७ मध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील उद्योगांचा वाटा केवळ सुमारे १५ टक्के होता.