

India AI budget 2026
esakal
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. ‘एआय’साठी अवाढव्य ‘डेटा सेंटर’ उभारावी लागतात. या बजेटमध्ये ‘लिथियम-आयर्न बॅटरीज’वर ‘बेसिक कस्टम ड्युटी’ कमी करण्यात आलेली आहे, यातून भारतात ‘एनर्जी स्टोअर’ करण्याच्या उत्पादनाला चालना देण्याचा विचार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयाला २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अतिशय गांभीर्याने हाताळण्यात आले आहे. हा उद्योग सर्व क्षेत्रांवर मोठा प्रभाव पाडणार आहे, यात आता काहीच शंका नाही. या उद्योगाच्या यशस्वी उभारणीत पाच स्तरांवर तंत्रज्ञानाचा विकास करावा लागतो आणि त्यात देशांतर्गत प्रतिभा विकसित करावी लागते. ‘ऊर्जा’, ‘सेमीकंडक्टर्स’, ‘क्लाऊड’, ‘एआय मॉडेल्स’ आणि ‘अप्लिकेशन्स’, हे ते स्तर आहेत. यापैकी एका जरी क्षेत्रात आपण मागे राहिलो, तर बदलत्या भू-राजकीय समीकरणांत देशाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते.