

Women cricket World Cup 2025
esakal
महिलांना कोणत्याही खेळात कारकीर्द करणे सोपे नसते. क्रिकेटमध्ये महिला संघाने मिळविलेले जगज्जेतेपद, हे अनेक अर्थांनी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. विश्वकरंडक विजयानंतरचा देशभरातील जल्लोष, माध्यमांमधली प्रसिद्धी यातून आपल्याला याची प्रचिती येते आहे. हे यश देशाच्या कानाकोपऱ्यातील मुलींना क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा देईल, अधिक मेहनत घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करेल.
भारतीय महिला क्रिकेट संघ असंख्य वेळेस विश्वकरंडक विजयाच्या स्वप्नापासून दूर राहिला. कधी उपांत्य, तर कधी अंतिम सामन्यातील पराभवाचे शल्य मनात ठेवून वाटचाल करत राहिला. अखेरीस २०२५चा घरच्या मैदानावरील विश्वकरंडक, हे शल्य दूर करणारा ठरला. ‘हरल्यावर कसं वाटतं, हे आम्ही अनेकदा अनुभवलं आहे. आता जिंकल्यावर कसं वाटतं, ते अनुभवायचे आहे,’ असं हरमनप्रीत कौरने विश्वकरंडकापूर्वी म्हटलं होतं. तिच्या म्हणण्यामागे देखील गेल्या काही वर्षांमधील याच निसटत्या पराभवांचं शल्य होतं.