
GST Council 56th meeting
esakal
अॅड. गोविंद पटवर्धन
जीएसटी परिषदेमध्ये जीएसटीच्या व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कररचनेमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ‘जीएसटी २.०’नुसार होणाऱ्या सुधारणा भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये एक परिवर्तनकारी आणि नागरिककेंद्रित पाऊल ठरेल, अशी आशा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘दिवाळी गोड करू’ असे म्हणत जीएसटीत सुधारणांचे सूतोवाच केले. सुधारणा विचाराधीन होत्या; पण कधी होतील याचा पत्ता नव्हता. पंतप्रधानांनीच घोषणा केल्याने जीएसटी परिषदेने तत्परता दाखवत त्यांच्या ५६व्या बैठकीत करदरांची फेररचना आणि अन्य महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. या सुधारणा चांगल्या असल्या, तरी राजकीयदृष्ट्या विरोधी सूर लावणारे काही जण असतातच. त्यात मुद्दे कमीच असतात. मात्र, यातील काही व्यक्ती अभ्यासू आणि तज्ज्ञांनी केलेल्या टीकेकडे लक्ष देणे गरजेचे असते. काही आक्षेप व त्यातील तथ्य बघू या.