
Lata Mangeshkar
esakal
‘‘ ज्ञानेश्वरांचा
अभंग गाते, भोळाभाव त्या स्वरात
असतो, म्हणून तो अभंग लोकांना आवडतो. पण आपण तो समजून गायलो की फक्त श्रद्धेने? आपण फक्त भक्तीने, श्रद्धेने तो अभंग गायलो. माउलीला काय म्हणायचे आहे ते आपल्याला कळले कोठे? नाही... नाही अजिबात कळले नाही. त्या साठी वाचन, मनन, चिंतन, आणि...’’ हे सांगत होत्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर. गीत, अभंग कसा समजावून घ्यायचा, काय करायचं असते, त्यासाठी हे सगळं लतादीदींनी हृदयनाथ यांना सांगितलंच, पण अजूनही काही सांगितलं, त्यांनी काय मार्गदर्शन केलं ते उलगडत आहेत पंडितजी...
मी आशयाचा -
प्रकाशाचा मागोवा घेते...
हृदयनाथ मंगेशकर
saptrang@esakal.com
स्वच्छ पण थोडी चुरगळलेली पांढरी साडी.
गळ्यात एक लांबलचक माळ,
कानात साधी कुडं, हातात बांगड्या,
एका हातात अतिशय मौल्यवान घड्याळ,
सावळ्या रंगावर कष्टाची साय.
सडपातळ पण थकलेला मूर्ती
पण डोळे ! थकलेले, पण दयार्द्र, अथांग,
करुणामय प्रभु रामचंद्रासारखे.
पुराणात आणि वाल्मिकी रामायणात
प्रभु रामचंद्रा एवढे सहनशील, अपार दुःख
भोगलेले, करुणामय, कृपासिंधू, सुंदर,
थोर उत्तुंग, लोभस दुसरे व्यक्तिमत्त्वच नाही.
जन्मापासून नुसते कर्तव्य, दुःख, त्याग
विरह, कृपा आणि करुणा. अशा प्रभुंचे डोळे
कसे असतील? बहुतेक दीदीसारखेच असतील.
दीदीच्या डोळ्यात प्रेम, भक्ती. दया, बुद्धी,
करुणा, त्याग यांचे प्रतिबिंब उमटायचे.
मी दीदीकडे चमकून बघितले.
आणि त्या दयार्द्र डोळ्याच्या थकलेल्या
सागरात, मायेच्या, प्रेमाच्या, करुणेच्या,
उधाण लाटा उधाळत नव्हत्या, पण
सागरावर उठणाऱ्या लहरी हळूहळू, अळुमाळु
मायेचे निळे नक्षीकाम करीत होत्या.
मघाशी संवादिनीतून उसळणाऱ्या उधाण
स्वरलाटांनी मी चिंब भिजलो होतो.
आता दीदीच्या डोळ्यातील माझ्यावरच्या
सनातन मायेने मी गुदमरून गेलो.
मी काही बोलण्याच्या आत माझ्याकडे बघत
ती खाली बसली. कपाटाला
एक हात टेकून काहीशी रेललेली.
‘‘अशीच असशील त्रिभुवन जननी
बघत देखल्या मज का वरूनी’’
‘‘बाळ नवीन गाणे करतो आहेस का ?
कोणाचे काव्य आहे ?’’