

Manik Varma Centenary Tribute
esakal
१६ मे १९२६ रोजी जन्मलेल्या ‘पद्मश्री’ माणिक वर्मा यांच्या सुरांनी मराठी घराघरांमध्ये भक्ती, प्रेम आणि कारुण्याचं एक आगळंवेगळं विश्व निर्माण केलं. आज त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने मराठी भावसंगीतातील या अजरामर स्वराची आठवण...
मराठी भाव संगीताच्या गाभाऱ्यात डोकावलं तर तिथे स्वरांच्या लख्ख तेजाने लकाकणारे एकाहून एक ‘माणिक-मोती’ पाहून रसिकांचं मन भारावून जातं. याच मंदिरातलं एक अढळ आणि मानाचं नाव म्हणजे, ‘पद्मश्री’ माणिक वर्मा. माणिक ताईंच्या स्वरांचा प्रवास जितका समृद्ध होता तितकेच त्यांच्याशी जोडलेले किस्सेही रंजक आहेत. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ पुण्यात एकदा एका संगीत कार्यक्रमात माणिक ताईंची मुलाखत घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून साक्षात पु. ल. देशपांडे (भाई) ही मुलाखत ऐकत होते. गप्पांच्या ओघात गाडगीळ यांनी विचारले, ‘तुमची आणि अमर वर्मा यांची पहिली भेट नेमकी कुठे झाली?’ लग्नाला अनेक वर्षे झाली असल्याने माणिक ताई लाजून त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळत होत्या. ते पाहून पहिल्या रांगेतील पु. ल. उत्स्फूर्तपणे मोठ्याने म्हणाले, ‘अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या ‘वर्मा’वर नको रे बोट ठेवूस!’ केवळ भाईच अशा प्रकारची कोटी करू शकत होते.