

Life Insurance Penetration
esakal
समीर जोशी
आयुर्विमा हे केवळ आर्थिक साधन नसून, प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेचा पाया आहे. बदलते तंत्रज्ञान, वाढती डिजिटल स्वीकारार्हता आणि छोट्या शहरांमधील नव्या संधी यांच्या पार्श्वभूमीवर, आयुर्विमा क्षेत्राची वाटचाल आणि एजन्सी चॅनेलची भूमिका याविषयी बजाज लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य एजन्सी अधिकारी समीर जोशी यांच्याशी प्राची गावस्कर यांनी खास ‘सकाळ मनी’साठी साधलेला संवाद.
प्रश्न : आजही आपल्या देशात आयुर्विम्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याबाबत आर्थिक साक्षरता आणि जागरूकता वाढविण्यासाठी संपूर्ण उद्योगाने कोणते सामूहिक प्रयत्न करायला हवेत, असे तुम्हाला वाटते?
जोशी : आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी विमा कंपन्या, नियामक, धोरणकर्ते, शैक्षणिक संस्था, नियोक्ते आणि वितरण भागीदार यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विमा क्षेत्राने ४१.८४ कोटी पॉलिसी जारी केल्या, ११.९३ लाख कोटी रुपयांचा प्रीमियम संकलित केला, ८.३६ लाख कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आणि ७४.४४ लाख कोटी रुपयांची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता नोंदवली. ही प्रगती महत्त्वाची असली तरी विम्याची माहिती असणे आणि त्याचे महत्त्व समजणे यात अजूनही मोठी तफावत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी संवाद अधिक सोपा करणे, दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा वापर करणे, प्रादेशिक भाषा आणि डिजिटल माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवर आर्थिक शिक्षणाची सुरुवात लवकर होणेही गरजेचे आहे. या प्रक्रियेत विमा सल्लागार आणि वितरक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील. ते गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगून कुटुंबांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यास मदत करतात.