khanderi underi naval conflict 1679
esakal
Premium|khanderi underi naval conflict 1679 : खांदेरी-उंदेरी सागरी संग्राम: मराठ्यांची जिद्द, सिद्धीचा हट्ट आणि इंग्रजांची कोंडी
केदार फाळके
श्रीशिवछत्रपती भारत भाग्यविधाता
मराठ्यांकडून इंग्रजांशी तोडगा निघावा म्हणून गुप्त प्रयत्न सुरू होते. २८ नोव्हेंबराला अनाजीपंत राजापूरात आल्यावर इंग्रज फॅक्टर्सशी त्यांची भेट झाली. व्यापार का थांबला याची चौकशी करीत त्यांनी सुबादारास इंग्रजांना त्रास न देण्याचा हुकूम दिल्याचे सांगितले; मात्र ‘बक्षिसांबाबत’ आपले हात बांधले असल्याचेही स्पष्ट केले. शिवाय ते महाराजांना इंग्रजांच्या वतीने शिफारस करतील, अशी खात्री दिली. इंग्रज फॅक्टर्सशी असणारी मैत्री दृढ करण्याची त्यांची इच्छा होती; म्हणूनच ते आपला दूत डेप्युटी गव्हर्नराकडे पाठविण्याच्या तयारीत होते.
डिसेंबर १६७९–जानेवारी १६८० या काळात नाकेबंदी पूर्ववत सुरू झाली. ३/४ डिसेंबराला दोन मराठा होड्या चतुराईने सिद्दीच्या गॅलियोट्सना भुलवून पुढे गेल्या—त्या इंग्रजांच्या जहाजाच्या नावाने आणि खलाशांच्या नावांनी आपली ओळख देऊन निसटल्या. त्याच दिवशी केग्विन सिद्दीच्या जहाजावर गेला. सिद्दी संयुक्त उतराईची वारंवार मागणी करीत असताना शिवाजी महाराजांना इंग्रजांच्या कृपेनेच एवढी मोकळीक मिळत आहे, असा युक्तिवाद करीत होता. तो ७०० सैनिक सज्ज ठेवून होता. त्याच वेळी दौलतखानाने मुंबईला शिवाजी महाराजांचे सौजन्यपूर्ण पण ठाम पत्र पाठविले—त्यामधून खांदेरी बांधणीचा निर्धार स्पष्ट दिसत होता. दौलतखानाच्या तक्रारीनुसार, सिद्दीने गावे जाळून लोक कैद केले आणि इंग्रज यास मूक संमती देत आहेत, अशी निराशाही व्यक्त केली. मुंबई कांउन्सिलाने सुरतेला कळविताना लिहिले की, ते हा वाद सभ्य मार्गाने मिटविण्यास तत्पर आहेत. ८ डिसेंबराला सिद्दीच्या उत्तराचा सारांश पाठवून त्यांनी सांगितले की, सिद्दी स्वतः खांदेरी ठेवण्यास इच्छुक नाही—फक्त तो शिवाजी महाराजांच्या हातात जाऊ नये एवढेच त्याचे ध्येय आहे. इंग्रजांनी साहाय्य केल्यास बेट इंग्रजांना देण्याचे आश्वासनही त्याने दिले.

