

Mumbai University History
esakal
प्रा. रवींद्र कुलकर्णी - sakal.avtaran@gmail.com'
१८ जुलै १८५७ हा दिवस भारतीय उच्च शिक्षणाच्या इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. याच दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. देशासह राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाची ओळख आहे. भूतकाळातील समृद्ध शैक्षणिक वारशाच्या प्रेरणेने मुंबई विद्यापीठाने ज्ञान व संशोधन क्षेत्रात नेतृत्व करण्याची उत्तुंग क्षमता सिद्ध केली आहे. गेली १६९ वर्षांपासून यशस्वीपणे जोपासलेले ज्ञानदानाचे पवित्र कार्य आणि सामाजिक मूल्ये हे विद्यापीठाचे बौद्धिक अन् नैतिक शक्तिस्थान राहिले आहे. यातूनच विद्यापीठाने मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला अव्वल दर्जाची गुणवत्ता बहाल केली आहे. विद्यापीठाने ज्ञानप्रसार, संशोधन, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मिती यांचा अखंड ध्यास घेतला. आज १६९ वर्षांचा हा प्रवास साजरा करताना विद्यापीठ केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाचा मागोवा घेत नाही; तर विकसित महाराष्ट्र २०३५ आणि विकसित भारत २०४७च्या राष्ट्रीय ध्येयपूर्तीत स्वतःचे योगदान अधिक प्रभावीपणे कसे असावे, याचाही गंभीर विचार करीत आहे.
मुंबई विद्यापीठाचा इतिहास हा केवळ एका शिक्षण संस्थेचा नाही; तर तो आधुनिक भारताच्या बौद्धिक उत्क्रांतीचा इतिहास आहे. १८५४च्या वुड्स डिस्पॅचनंतर भारतात आधुनिक विद्यापीठीय शिक्षणाची पायाभरणी झाली आणि त्यातून मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. उत्तरेकडील सिंध प्रांतापासून ते आजच्या दक्षिण कर्नाटकापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी देणारे हे एकमेव विद्यापीठ होते. सुरुवातीला परीक्षा घेणारे आणि संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक नियमन करणारे विद्यापीठ म्हणून सुरू झालेली ही संस्था पुढे अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि ज्ञाननिर्मितीचे अग्रगण्य केंद्र बनली.