

Kashmir conflict
esakal
राजकारण मोठं गमतीचं असतं. याची प्रचिती मागच्या आठवड्यात दोन घटना देत होत्या. पहिली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण. त्यात त्यांनी नेहरू आडवे आले, नाहीतर पटेलांनी संपूर्ण काश्मीर भारतात विलीन केलं असतं, असा ऐतिहासिक शोध मांडला. अर्थात त्यांचा उद्देश नेहरू चुकले असं सांगत त्यांच्या आजच्या वारसदारांना कोंडीत पकडणं हाच असणार. दुसरी घटना दूर अमेरिकेत न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानी या तरुणाच्या विजयानं जगाचे लक्ष वेधलं.
अमेरिकेतील अब्जाधीशांच्या नाकावर टिच्चून संपत्तीच्या न्याय्य वाटपावर बोलणारे ममदानी विजयी भाषणात आठवण काढत होते पंडित नेहरूंची, त्यांच्या ‘नियतीचा करार’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या १५ ऑगस्ट १९४७ च्या भाषणाची. मोदी सांगत होते काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात राहिला, त्याच्या वेदना अनेक दशकं भारत भोगतोय. ममदानी नेहरूंपासून जुनं मागं टाकत नवं काही घडवण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगत होते. दोन्हीकडं आजच्या राजकारणात नेहरूंच्या नावाचा वापर होता. एक नकारात्मकता भरलेला, दुसरा प्रेरणास्रोत म्हणून.