

Nifty MNC Index returns
esakal
प्रमोद पुराणि - pramodpuranik५@gmail.com
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध असलेल्या आणि परदेशी प्रवर्तकांकडे ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर ताब्यात आहे अशा ३० कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे ‘निफ्टी एमएनसी इंडेक्स’. या ३० कंपन्या मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअरच्या संवेदनशील निर्देशांकातील (सेन्सेक्स) सर्व कंपन्यांच्या तुलनेने अत्यंत चांगल्या कंपन्या आहेत. या निर्देशांकांची थोडक्यात माहिती करून घेऊ या.
‘निफ्टी एमएनसी इंडेक्स’मधील ३० कंपन्यांपैकी काही कंपन्या संवेदनशील निर्देशांकात (सेन्सेक्स) आहेत. काही होत्या, काहींची हकालपट्टी झाली. परंतु, या कंपन्या भागधारकांसाठी अत्यंत चांगल्या कंपन्या ठरल्या आहेत, कारण या कंपन्यांचे लाभांश वाटप, बोनस शेअर वाटप अतिशय चांगले आहे. इतर कंपन्यांच्या शेअरपेक्षा हे सर्व शेअर वरवर बघता फारच महागडे शेअर वाटतात, कारण या सर्व कंपन्यांचा पीई रेशो जास्त आहे. यातील बहुतेक कंपन्या बाजारात सूचिबद्ध झाल्या, याचे मुख्य कारण १९७३ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘फेरा’ कायदा आणला. या कायद्यानुसार भारतात असलेल्या या बहुदेशीय कंपन्यांना आपल्या शेअरची प्रथम मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध करणे सक्तीचे झाले. या काळात कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज नावाच्या संस्थेला कंपन्यांनी भारतीय भागधारकांना शेअरची विक्री करताना काय अधिमूल्य घ्यावे, हे ठरविण्याचा अधिकार होता. त्यामुळे या कंपन्यांना फारच कमी अधिमूल्याने शेअरची विक्री करावी लागली. त्यामुळे अनेकांनी हे शेअर घेतले, अनेकांनी ते दीर्घकाळ सांभाळण्याचे कष्ट घेतले आणि त्यामुळे ते कोट्यधीश झाले. हिंदुस्थान लिव्हर या कंपनीचा १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर १९७८ मध्ये फक्त सहा रुपये अधिमूल्य घेऊन दिला आणि तरीसुद्धा या कंपनीचे अधिमूल्य फार जास्त आहे, अशी कुरकुर करणारे गुंतवणूकदार होते. फक्त ४०० रुपयांत २५ शेअरचे वाटप झाले आणि त्यानंतर या गुंतवणुकीचे मूल्य कोटी रुपयांच्या घरात गेले. या निर्देशांकातील कंपन्यांची अशी अनेक उदाहरणे देता येतील.