
आपल्या संरक्षण दलांच्या काही मोहिमा इतक्या अफाट आहेत की, त्यांच्याशिवाय भारताचा युद्धइतिहास अपूर्ण मानला जातो. जय-पराजयाच्या पुढे जाऊन दुर्दम्य इच्छाशक्तीला चिवट प्रयत्नांची जोड देऊन या मोहिमांनी मोठा दूरगामी परिणाम साधलेला दिसून येतो. ठरलेल्या युद्धयोजनेत आणखी पुढचा वाव आहे असं दिसताच स्वतंत्रपणे, पण अचाट काम करून दाखवणारा भारतीय लष्करातला एक सेनापती म्हणजे लेफ्टनंट जनरल सगत सिंह! संधी दिसताच जोखीम स्वीकारून त्यांनी शत्रूला चपराक दिल्याचे दिसून येते. १९७१च्या भारत-पाक युद्धात या सेनापतीने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ज्या पद्धतीने त्यांनी मेघना नदी ओलांडून ढाका येथे सैन्याला पोहोचवलं ते त्यांच्या लष्करी प्रतिभेचं एक ज्वलंत उदाहरण आहे. ती मोहीम म्हणजेच, ऑपरेशन कॅक्टस लिली! ९ ते १२ डिसेंबर या दरम्यान भारतीय लष्कर आणि वायुसेनेने एकत्रितपणे पार पाडलेली ही एक महत्त्वपूर्ण मोहीम ठरली.
१४ जुलै १९१९ रोजी राजस्थानमधल्या चुरू जिल्ह्यातल्या (तत्कालीन बिकानेर संस्थानात) कुसुमदेसर इथे जन्मलेले सगत सिंह यांना शौर्याचा मोठा वारसा लाभला होता. त्यांचे वडील ब्रिजलालसिंह राठोड ब्रिटिश सैन्यात लढले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भावंडांमध्ये सगळ्यात मोठे असणारे सगत सिंह शिक्षण पूर्ण करून १९३८ साली बिकानेर संस्थानात सैनिक म्हणून भरती झाले. अनेक मोहिमांमधून, विशेषत: दुसऱ्या महायुद्धात आपल्या अद्भुत शौर्याचा परिचय दिल्याने त्यांना पदोन्नती मिळाली. पुढे स्वतंत्र भारताच्या लष्करात ३ गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. पुढे याच युनिटचे ते कमांडिंग ऑफिसरही झाले. १९६१ साली ब्रिगेडियर हे पद ग्रहण करून ५० व्या पॅराशूट ब्रिगेडचं नेतृत्व त्यांनी केलं.