

Chhatrapati Shivaji Maharaj Fort Strategy
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, लष्करी रणनीती आणि दुर्गबांधणी कौशल्याचा जिवंत पुरावा म्हणजे पारगड. स्वराज्याच्या दक्षिण सीमेवर उभारलेला हा दुर्ग केवळ एक किल्ला नसून मराठ्यांची शौर्य, निष्ठा आणि अखंड जागरूकतेचे प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जसे युद्धशास्त्र निपुण, आरमार तज्ज्ञ, महान सेनानी, संवेदनशील राजा, जलतज्ज्ञ, कुशल प्रशासक, शेतकऱ्यांचे कैवारी, न्यायप्रिय युगपुरुष, मुत्सद्दी आणि धाडसी योद्धा होते, तसेच ते उत्तम गडतज्ज्ञ (Fort Arche) होते. गडदुर्ग कोठे असावेत, त्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, सदर, बुरूज कशाप्रकारचे असावेत, याबाबत ते प्रचंड निष्णांत होते. गडदुर्गांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. ‘गडदुर्ग हे संपूर्ण राज्याचे सार आहे... दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय होतो. प्रजा भग्न होते. देश उद्ध्वस्त होतो’ हे त्यांचे गडदुर्गाबद्दल मत होते. गडदुर्ग हे राज्याचे रक्षणकर्ते आहेत. राज्याचा खजिना आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे गडदुर्ग आहेत. दुर्गामुळे कमी सैन्याच्या मदतीने बलाढ्य शत्रूविरुद्ध लढता येते. स्वराज्याच्या अस्तित्वासाठी दुर्ग महत्त्वाचे आहेत. पाणी, धान्य, दारूगोळा आणि पुरेशी शिबंदी असेल तर गडदुर्गांच्या मदतीने बलाढ्य शत्रूला पराभूत करता येते, हे शिवाजीराजांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी अनेक गडदुर्ग जिंकले. या गडदुर्गांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा गड आहे, पारगड!